एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांचं काल एक वादग्रस्त विधान समोर आलं होतं. त्यांनी हिंदू मुलींच्या लग्नाबाबत बोलताना, हिंदूंनी मुलींचे लग्न १८ ते २० वर्षात केलं पाहिजे, त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला पाळला पाहिजे असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या, भाजपा नेत्यांनी जोरदार टीका सुरू केली. यानंतर आता खासदार अजमल यांनी माघार घेत, शब्द मागे घेत असल्याचं म्हटलं आहे.

“माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. सरकारने अल्पसंख्यांकांना न्याय द्यावा आणि त्यांना शिक्षण व रोजगरार द्यावा, अशी माझी इच्छा आहे.” असं खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी कालच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आसाममधील करीमगंज येथील एका कार्यक्रमात खासदार अजमल यांनी “मुलीचं वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने परवानगी दिली आहे. ते (हिंदू) लोक ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत. या काळात दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुलं होऊ देत नाहीत. ते आपला खर्च वाचवतात. एकप्रकारे ते चेष्टा करतात. ४० वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केलं किंवा ते कुठे अडकले तर ते लग्न करतात.” असं म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “पण ४० वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? तेथून पुढे मूल जन्माला घालायचं आणि त्याला वाढवायचं, अशी आशा ते कसं काय ठेवू शकतात? योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात. त्यामुळे मुस्लिमांचा हा फॉर्म्युला तुम्हीही मान्य करायला हवा. आपल्या मुलाचं लग्न २० ते २२ वर्षात आणि मुलीचं लग्न १८ ते २० वर्षात करावं, मग बघा तुमच्यातही अनेक मुलं जन्माला येतील” असंही बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटलं होतं.