इटलीच्या दोन नौसैकांना भारतीय मच्छिमारांच्या हत्येसंबंधी खटल्याला सामोरे जाण्यासाठी भारतात परत पाठवल्याचा निर्णय आपल्याला न पटल्याने आपण राजीनामा देत आहोत अशी घोषणा इटलीचे परराष्ट्र मंत्री गिलिओ तेरझी यांनी येथे केली.
 त्यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात सांगितले की, आपण या सरकारमध्ये राहू इच्छित नाही. इटलीचे दोन नौसैनिक भारतीय मच्छिमारांना ठार केल्याच्या गुन्ह्य़ात अडकले होते त्यांना परत पाठवण्याबाबत आपण अनुकूल नव्हतो पण सरकारने आपले म्हणणे ऐकून घेतले नाही त्यामुळे शेवटी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
मारियो माँटी यांच्या काळजीवाहू सरकारने शुक्रवारी इटलीच्या नौसैनिकांना खटल्याला सामोरे जाण्यासाठी परत न पाठवण्याचा ११ मार्च रोजीचा निर्णय बदलून त्यांना भारतात परत पाठवले आहे. त्यांना फाशी दिले जाणार नाही असे भारत सरकारने यावेळी इटलीला सांगितले होते. त्यामुळे या दोन नौसैनिकांना इटलीने भारतात पाठवले होते. फेब्रुवारी २०१२ मध्ये तस्करी विरोधात व्यावसायिक टँकरवर काम करणाऱ्या इटलीच्या दोन नौसैनिकांनी दोन भारतीय मच्छिमारांना गोळीबारात ठार केले होते. त्यानंतर ते एकदा इटलीला जाऊन परत आले, पण दुसऱ्यांदा मतदान करण्यासाठी परत येण्याच्या बोलीवर भारताने त्यांना मायदेशी जाऊ दिले पण नंतर या नौसैनिकांना भारतात पाठवणार नाही अशी भूमिका इटली सरकारने घेतली होती.