केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते ‘जैश-ए- मोहम्मद’च्या रडारवर असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. ‘जैश’चा प्रमुख मौलाना मसूद अझहरने भारतातील नेत्यांना टार्गेट करण्यासाठी दहशतवाद्यांचे एक पथकच तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील काहींनी बांगलादेशमार्गे भारतात प्रवेश केला असून गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे.
गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार ‘जैश-ए- मोहम्मद’ आणि ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनांनी एकत्र येऊन भारतातील केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांवर हल्ल्यांचा कट रचला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार ज्या मुख्यमंत्र्यांना कमी सुरक्षा त्यांनाच लक्ष्य करण्याची योजना या दहशतवादी संघटनांनी आखली आहे. यासाठी बांगलादेश कॅडरमधील दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. यातील काही दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याची खातरजमा करण्यासाठी ढाकाजवळ लपून बसलेल्या दहशतवाद्यांची माहिती बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांना दिली होती. बांगलादेशमधील सुरक्षा यंत्रणांनी आम्ही दिलेल्या पत्त्यांवर धडकही दिली, मात्र तिथून ठोस माहिती हाती लागली नाही, असे सूत्रांनी सांगितले.
अझहरविरोधात भारताते सुरु असलेले प्रयत्न आणि त्याचा भाचा तल्हा रशीदचा सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत खात्मा झाल्याने ‘जैश’ला हादरा बसला आहे. याचा बदला घेण्यासाठी मसूद प्रयत्न करु शकतो, असे सांगितले जाते. पुलवामा आणि अन्य भागांमधील दहशतवादी हल्ल्यांमागे तल्हा रशीदचा हात होता. जम्मू- काश्मीरमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ची जागा घेण्याचा ‘जैश’चा प्रयत्न आहे. ‘जैश’ राज्यात सक्रीय झाली आहे. तर दुसरीकडे सुरक्षा दलाने ‘जैश’विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. दोन दिवसांपूर्वी जम्मू- काश्मीर पोलिसांच्या गुप्तचर विभागानेही लष्कर-ए-तोयबा लेहमधील विमानतळावर हल्ला करु शकते, असा इशारा दिला होता.