झारखंडच्या जामतारा शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. जामतारा आणि विद्यासागर स्थानकांदरम्यान रेल्वेने रुळांवरील काही प्रवाशांना चिरडलं आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या दोन जणांचे मृतदेह बचावपथकांना सापडले आहेत. गडद अंधार असल्याने रेल्वेने नेमक्या किती जणांना धडक दिली, यात किती जण जखमी झाले आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती मिळाली नाही. दरम्यान जामतारा ते विद्यासागर स्थानकांदरम्यान बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेस डाऊन दिशेने प्रवास करत होती. त्याचवेळी रेल्वे रुळाच्या बाजूने टाकण्यात आलेली माती वर उडत होती. धूळ आणि माती रेल्वेच्या खिडकीपर्यंत उडत होती. त्यामुळे त्या रेल्वेमधील प्रवाशांना वाटू लागलं की, या रेल्वेला आग लगली आहे आणि धूर निघतोय. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेची साखळी (रेल्वे थांबवण्यासाठीची साखळी) ओढून बाहेर उडी मारली. त्याचवेळी एक ईएमयू ट्रेन बाजूच्या रुळावरून जा होती. त्यामुळे बंगळुरू-यशवंतपूर एक्सप्रेसमधून बाहेर उड्या मारणारे प्रवासी या ईएमयू ट्रेनखाली आले. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या अपघाताबाबत रेल्वेनेही अधिकृत निवेदन जारी केलं आहे. परंतु, रेल्वेने आग लागल्याच्या अफवेचा कुठेही उल्लेख केलेला नाही. रेल्वेने सांगितलं आहे की, प्रवाशांनी अलार्म चेन ओढल्याने ट्रेन नंबर १२२५४ थांबवण्यात आली होती. त्यानंतर ट्रेनमधील काही प्रवासी उतरून बाजूच्या रुळावर आले. त्याचवेळी बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या एमईएमयू ट्रेनने या प्रवाशांना धडक दिली. तसेच रेल्वेने म्हटलं आहे की, या अपघातात मृत्यू झालेले, जखमी झालेल्यांपैकी काहीजण रेल्वेचे प्रवासी नव्हते. याप्रकरणी तपास करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा

दरम्यान, या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, जामतारा येथे झालेल्या अपघाताची बातमी ऐकून दुःख झालं. ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.