आपल्या देशातील साठ वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेला माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी काठावर पास केले आहे. आपल्या लोकशाहीला दहापैकी पाच गुण देता येतील, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक तज्ज्ञतेची प्रशंसा करताना त्यांची जलद निर्णयक्षमतेसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले आहे. येथील एका कार्यक्रमात रिइनव्हेन्टिंग डेमोक्रसी- द यूथ एक्सपिरिमेंट या विषयावर व्याख्यान दिले. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर मते मांडली
भारतीय लोकशाहीचे मूल्यमापन दहाच्या मोजपट्टीवर कसे कराल असे विचारले असता ते म्हणाले की, १९४७ ते २०१३ दरम्यानचा काळ पाहता लोकशाही पुढे नेण्यासाठी आपल्याला राज्यघटना मिळाली, ते मोठे पाऊल होते पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर मी भारतीय लोकशाहीला पाच गुण देईन. तुम्ही दिलेले गुण हे चांगली कामगिरी दर्शवत नाहीत याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ते पासापुरते गुण आहेत.
तुमच्या पसंतीचा राजकीय नेता कोण असे विचारले असता ते म्हणाले की, मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रातील तज्ज्ञ आहेत, त्यांच्या तज्ज्ञतेविषयी शंका नाही. अर्थव्यवस्थेबाबत त्यांचे निर्णय योग्यच आहेत, त्यांच्याविषयी मला आदरच वाटतो. वाजपेयी हे जलद निर्णय घेत असत. हा दोघांमधला फरक आहे, दोघांचेही काम पूरक आहे.
सक्षम युवा मने ही देशाची मोठी ताकद आहे व लोकशाहीत वेगाने विकासाची त्यांची अपेक्षा आहे. देश हा राजकीय व्यवस्थेपेक्षा मोठा आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. सर्व श्रद्धा, संस्कृती यांचा मान ठेवणारा समाज निर्माण केला पाहिजे. भ्रष्टाचाराचा कर्करोग व विलंबित न्यायाने आलेले नैराश्य हे दोन प्रश्न हाताळले गेले नाहीत तर मानवाच्या सक्षमीकरणाच्या आंतरप्रेरणेतून क्रांती सुरू होईल म्हणूनच लोकशाही मजबूत करणे हाच मार्ग योग्य आहे, असे त्यांनी सांगितले.आदर्श राजकीय नेत्याच्या संकल्पनेबाबत त्यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी लोकांना दारिद्रय़, भ्रष्टाचार यातून बाहेर काढावे. राजकीय नेत्याने तीस टक्के वेळ राजकारणावर खर्च करावा पण ते उलट करतात ते ७० टक्के वेळ राजकारणात घालवतात व तीस टक्के वेळ विकासाला देतात. अलीकडच्या काही निवडणुकांत लोकांनी विकासाच्या मुद्दय़ाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांनाच अनुकूल कौल दिला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2013 रोजी प्रकाशित
भारतीय लोकशाही काठावर पास -कलाम
आपल्या देशातील साठ वर्षांच्या लोकशाही व्यवस्थेला माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी काठावर पास केले आहे. आपल्या लोकशाहीला दहापैकी पाच गुण देता येतील, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक तज्ज्ञतेची प्रशंसा करताना त्यांची जलद निर्णयक्षमतेसाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले आहे.

First published on: 16-03-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalam gives pass marks to six decade old indian democracy