कर्नाटक सरकार कावेरीच्या पाण्याचा विसर्ग करीत नसल्याचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलेला आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेटाळला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारावरच कावेरीच्या पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले आहे.
जयललिता यांनी याबाबत केलेले आरोप निराधार असल्याचे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. जयललिता आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेच याबाबत ठोस पावले उचलण्यात असमर्थ ठरले, असेही सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
जयललिता आणि देवेगौडा हेच या समस्येचे मूळ कारण आहे. कावेरी प्रश्नावर आपली भूमिका काय, याची दोघांनाही जाणीव आहे आणि आपल्या चुका झाकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, असेही सिद्धरामय्या म्हणाले.
कावेरीतून एक थेंबही पाणी तामिळनाडूला न देण्याचा निर्धार काँग्रेस आणि भाजपने केला असल्याचा आरोप जयललिता यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता.
मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कावेरीतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे, अशी ग्वाही सिद्धरामय्या यांनी दिली. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या येथे आले आहेत.