स्वतःच्या चुकीबद्दल संजय दत्तने खूप यातना भोगल्यात, त्याला आणखी भोगायला लावू नका, या शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी संजय दत्तची सोमवारी पाठराखण केलीये. सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला सुनावलेली शिक्षा माफ करावी, अशी मागणी विविध राजकीय नेत्यांसह, बॉलिवूडमधील कलाकारांनी केलीये. काही राजकीय पक्षांनी शिक्षामाफीला विरोध केला. संपूर्ण देशात या विषयावरून दोन तट पडल्याचे दिसत असताना, बॅनर्जी यांनी शिक्षामाफीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला.
संजय दत्तला आणखी भोगायला लावू नका, अशी विनंती पश्चिम बंगालमधील विविध लोकांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी माझ्याकडे केली असल्याचे बॅनर्जी यांनी ‘फेसबुक’वरील पोस्टमध्ये लिहिलंय. संजय दत्तची शिक्षा माफ करणे, माझ्या हातात नसले, तरी मला असे वाटते की, तरुण वयातील चुकीबद्दल त्याने खूप भोगलंय. या सगळ्यातून तावून सुलाखून त्याने पुन्हा आपले करिअर सुरू केलंय, असे त्यांनी लिहिले आहे.
संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांच्यासोबत मी टाडा कायद्याच्या गैरवापराबद्दल त्यावेळी लढा दिला होता. ते कधीही कोलकात्याला आले की, कायम माझ्या घरी येत होते. ते जर आज जिवंत असते, तर संजयला आणखी यातना भोगायला लागू नयेत, यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केले असते, असेही बॅनर्जी यांनी म्हंटले आहे.