गरीबी हटाव हा नारा देताना काँग्रसला लाज कशी वाटत नाही? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या आजीने आणि पणजोबांनी हेच आश्वासन दिले होते. मात्र गरीबी दूर झाली नाही असेही ते म्हटले.

या देशाला विकासाकडे फक्त मोदी नेऊ शकतात. त्यामुळे त्यांनाच निवडून द्या आणि रक्षा खडसेंना प्रचंड बहुमताने विजयी करा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेरमध्ये केलं. रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी ते रावेरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. ५५ वर्षे या देशात एक अनाचारी दुराचारी राजवट काँग्रेसने दिली. तर मोदींनी पारदर्शी कारभार केला असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

हा देश कुणाच्या हातात द्यायचा? हे ठरवण्याची वेळ आली आहे. पारदर्शी कारभार करणा-या मोदींच्या हाती? की खोटी आश्वासनं देणा-या काँग्रेसच्या हाती? असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. राहुल गांधी काय वाट्टेल ते बोलत आहेत..७२ हजार शेतक-यांना देणार अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली. मात्र हे पैसे कुठून आणणार याचे त्यांच्याकडे उत्तर नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा बदला घ्यावा ही जनभावना होती. मोदींनी सैन्याला पूर्ण सूट दिली ज्यानंतर आपल्या वायुसेनेने बालाकोटमधे एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला उत्तर दिले. याचही त्रास काँग्रेसला झाला म्हणून ते पुरावे मागत आहेत अशीही टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा काँग्रेसला निवडून देणार का?असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे.