नांदेड जिल्हय़ाच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथील नदाफ एजाझ अब्दुल रौफ याला यंदाचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला.
यंदा देशातील १८ बालकांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नदाफ एजाझ अब्दुल रौफचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ जानेवारी २०१८ रोजी या शूरवीर बालकांना गौरविले जाईल.
नांदेड जिल्हय़ातील पार्डी (मक्ता) येथील एजाझने धाडस दाखवून दोन मुलींना तलावात बुडण्यापासून वाचविले होते. त्याने दाखविलेल्या साहसाची नोंद घेत त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी ला राजपथावर होणाऱ्या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.
३० एप्रिल २०१७ रोजी पार्डी गावातील काही महिला व मुली येथील बंधाऱ्यावर कपडे धुन्यासाठी गेल्या असता त्यातील एका मुलीचा पाय घसरून ती तलावात पडली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मैत्रिणीने पाण्यात उडी घेतली. मात्र, बंधाऱ्यात त्या दोघी बुडायला लागल्या. हे चित्र पाहून दोन अन्य मुलींनी बुडणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण त्यांनाही पोहता येत नव्हते. बुडणाऱ्या मुलींचा आवाज ऐकून लोक तलावावर मदतीसाठी गेले. या वेळी शेताकडे निघालेल्या इजाजने बंधाऱ्याजवळील लोकांचा जमाव बघत तिकडे धाव घेतली. त्याने प्रसंगवधान व धाडस दाखवून पाण्यात उडी घेतली. २० फूट खोल पाण्यात तो मुलींचा सतत शोध घेत राहिला व त्याने यातील तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले. दुर्दैवाने यातील दोन मुलींचा मृत्यू झाला. इजाज हा पार्डी येथील राजाबाई हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यलय येथे दहावीत शिकत असून लष्करात रुजू होऊन देशाची सेवा कराण्याची त्याची इच्छा आहे.
७ मुली आणि ११ मुले अशा एकूण १८ बालकांना वर्ष २०१७च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ३ बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चार श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे आहे. पुरस्कारप्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्या वतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रिकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.