पंजाब नॅशनल बँकेत १२,६०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला सरकार भारतात परत आणणार आहे असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. एनडीएने भ्रष्टाचारमुक्त सरकार दिलं असल्याचंही त्या यावेळी बोलल्या आहेत.

‘आपल्या सिस्टीममध्ये असलेल्या कमतरता वाढू नयेत यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नीरव मोदी आणि मेहुल चोकसी पळून गेले आहेत, आम्ही त्यांना परत आणू’, असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी सरकार सुधारणा करण्यासाठी तयार असल्याचंही सांगितलं. तसंच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सरकारने घेतलेल्या धाडसी निर्णयांपैकी एक असल्याचंही त्या बोलल्या आहेत.

मोदी सरकारने सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांवर बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘जीएसटीमध्ये काही कमतरता असू शकतात, मात्र सरकारने यशस्वीपणे त्याची अंमलबजावणी केली आहे. जीएसटी रद्द करण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र सरकार प्रगती करण्यासाठी कटिबद्ध असून, जीएसटीसारखे धाडसी निर्णय घेण्याची हिंमत ठेवतं’.

‘सरकारमध्ये भ्रष्टाचारासारखा कोणताही घटक नसून, सरकारचे सर्व निर्णय योजनांवर आधारित आहेत. भ्रष्टाचारमुक्त सरकार म्हणजे पैसा योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांसाठी खर्च होत आहे’, असंही त्या बोलल्या आहेत. तसंच डिजिटायजेशमुळे लोकांना थेट फायदा मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.