संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक सरकार सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर प्रथमच लोकसभेत कृषी कायदे निरसन विधेयक २०२१ सादर करणार आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे संकेत विरोधकांनी रविवारी सर्वपक्षीय बैठकीत दिले. या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संसदेच्या आवारात माध्यमांशी साधलेल्या संवादात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार असल्याचं माध्यमांना सांगितलं. त्याचसोबत अधिवेशनादरम्यान, शांतता राखण्याचं आवाहनही केलं. पंतप्रधान म्हणाले, “हे संसदेचे महत्वपूर्ण अधिवेशन आहे, देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अधिवेशनात संसद देशाच्या हितासाठी चर्चा करेल, देशाच्या प्रगतीसाठी मार्ग शोधेल, दूरगामी प्रभाव टाकणारे परिणामकारक निर्णय घेईल”.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “अधिवेशनादरम्यान किती गोंधळ झाला, किती तास वाया गेले हा मापदंड मानण्यापेक्षा किती काम झालं, सकारात्मक काम किती झालं हा असायला हवा. सरकार प्रत्येक विषयावर खुली चर्चा करण्यास तयार आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे. मात्र हे प्रश्न शांतता राखून विचारायला हवेत. सरकारच्या धोरणांबाबत कितीही प्रखर विरोध असला तरी संसदेची प्रतिष्ठा राखणं गरजेचं आहे. संसदेत असं आचरण असायला हवं की ते देशाच्या तरुण पिढीसाठी आदर्श ठरेल”.