सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धभूमीत तीन हजारांहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त झाली आहे. याप्रकरणी त्यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेकरता योजना आखण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरदेखील उपस्थित होते. गेल्या आठवड्यात सुदानमध्ये एका भारतीय नागरिकाला गोळी लागली होती, याप्रकरणी मोदींनी शोक व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधानांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे, घडामोडींचे बारकाईने निरीक्षण करण्याचे आणि सुदानमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचे सतत मूल्यांकन करण्याचे आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच पीएम मोदींनी आपत्कालीन निर्वासन योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या क्षेत्रातील शेजारी देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडेही लक्ष ठेवण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारत संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमेरिका, ब्रिटन, यूएई आणि सौदी अरेबियाशी बोलून समन्वय सुरू केला असल्याचेही वृत्त आहे. गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमुळे राजधानी खार्तूम आणि ओमदुरमनचे नाईल शहर हादरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी ४१३ नागरिक या युद्धात मृत झाल्याची आकडेवारी जाहीर केली. तर, ३ हजार ५५१ नागरिक जखमी झाल्याचेही सांगितले.