काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज ललितपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पाली आणि नयागावला पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेतली. खतासाठी रांगेत उभे असताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची प्रियंका गांधींनी भेट घेतली. पीडित शेतकरी कुटुंबांची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बुंदेलखंडमधील शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. खतासाठी लांबच लांब रांगा आहेत. खताची चोरी होत असल्याने शेतकरी नाराज आहेत, शेतकऱ्यांना १२०० रुपये किमतीचे खत २००० रुपयांना विकत घ्यावे लागत आहे, असं त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधी यांनी शेतकरी बल्लू पाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. खताच्या कमतरतेमुळे बल्लू पाल यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यादरम्यान प्रियंका गांधी यांनी नायगाव आणि माळवाडा खुर्द येथील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. माळवाडा खुर्द येथील सोनी अहिरवार या शेतकऱ्याने ३-४ दिवस रांगेत उभे राहूनही खत न मिळाल्याने तणाव आल्याने गळफास लावून घेतला. उत्तर प्रदेशमधील भाजपा सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.

खताची खूप टंचाई आहे. शेतकरी नाराज आहेत. मृत बल्लू पाल उपाशीपोटी तीन-चार दिवसांपासून खताच्या दुकानात रांगेत उभा होता. खत न मिळाल्याने निराशेने त्याने आत्महत्या केली. अशीच परिस्थिती माळवाडा खुर्द येथील शेतकऱ्याचीही झाली आहे. एका शेतकऱ्याला खतासाठी रांगेत उभं असताना हृदयविकाराचा झटका आला. भाजपाच्या राजवटीत शेतकरी त्रस्त आहेत. अधिकाऱ्यांकडून खतांचा काळाबाजार होत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाले असून ही व्यवस्था त्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे. उत्तर प्रदेशमध्ये २०२२मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल, अशी घोषणा प्रियंका गांधी यांनी केली.