डेहराडूनमध्ये कामचुकार पोलिसांना शिक्षा देण्यासाठी अभिनव पद्धत अवलंबिली आहे. अशा कर्मचाऱ्यांना एकटय़ानेच रानात रात्र काढावी लागणार आहे. तथापि, या कर्मचाऱ्यांना आपली चूक सुधारण्यासाठी प्रथम १५ दिवसांची संधी देण्यात येणार आहे.
जे नागरिक पोलिसांकडे मदतीसाठी जातात त्यांची मदत करण्याऐवजी पोलीस मदतीची याचना करणाऱ्यांशीच असभ्य वर्तन करतात, अशा आशयाच्या तक्रारी आल्याने उत्तराखंड पोलिसांनी असा अभिनव पद्धतीचा अवलंब करण्याबाबतचा फतवा जारी केला आहे.
कर्तव्यात कसूर करण्याचा अथवा जनतेशी गैरवर्तन केल्याचे आढळल्यास त्यांना एक दिवस एकटय़ानेच रानात काढावा लागेल आणि तेथून जिवंत परतण्याची शक्यता जवळपास कमीच असेल, असे केवल खुराणा या पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.
तथापि, ही शिक्षा केवळ कर्तव्या कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच देण्यात येणार असून १५ दिवसांत आपल्या भूमिकेत सुधारणा न केल्यासच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.