पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ आता भारतीय रेल्वेनेही स्थानकांच्या विकासासाठी अनिवासी भारतीयांना साद घालण्याचे ठरवले आहे. त्यासाठी एक योजना आखण्यात आली असून या योजनेतंर्गत अनिवासी भारतीयांना त्यांच्या मूळ गावातील किंवा शहरातील स्थानके दत्तक घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी उद्युक्त केले जाणार आहे. रेल्वे स्थानकांवरील परिस्थिती सुधारण्यासाठी आणि प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देशातील मोठी कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वयंसेवी संस्थांनाही या योजनेत सहभागी करून घेण्याचा रेल्वेचा मानस आहे. या योजनेचा अंतिम मसुदा संबंधित मंत्रिमंडळातर्फे तयार करण्यात आला असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर जनतेच्या प्रतिक्रिया मागविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य व्ही.के.गुप्ता यांनी दिली. दरम्यान, या योजनेसाठी सध्या ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामधील अनिवासी भारतीय मोठ्याप्रमाणावर उत्सुक असल्याचे समजत असून, त्यासाठी दोन्ही देशांतील दुतावासांशी रेल्वेचे अधिकारी संपर्कात आहेत.