ऋषिकेश बामणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे पाकिस्तानसमोर पाच षटकांत १३६ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवण्यात आले आणि पुन्हा एकदा डकवर्थ-लुइस नियम वादाच्या भोवऱ्यात सापडले. साहजिकच पाकिस्तानला सामना गमवावा लागला, मात्र डकवर्थ-लुइसचा फटका बसलेला पाकिस्तान हा पहिला संघ नसून यापूर्वीही अनेक संघांवर ही आपत्ती ओढवली आहे, तर काहींना या नियमाचा तितकाच लाभही झाला आहे.

१९९२च्या विश्वचषकात सर्वप्रथम पावसाच्या व्यत्ययानंतरही सुधारित लक्ष्य देऊन सामन्याचा निकाल लागण्याची प्रथा सुरू झाली. मात्र त्यावेळी या नियमाला डकवर्थ-लुइस हे नाव नव्हते. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत पावसामुळे भारतापुढे ऑस्ट्रेलियाने दिलेले २३८ धावांचे आव्हान सुधारित करून ४७ षटकांत २३६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र भारताला फक्त एका धावेने पराभव पत्करावा लागला. याच दिवशी अ‍ॅडलेडला झालेल्या अन्य सामन्यात पाकिस्तानला ७४ धावांत खुर्दा पाडल्यानंतर इंग्लंडची १ बाद २४ अशी अवस्था असताना पावसाचे आगमन झाले व सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानचे नशीब उजळले.

पावसाच्या नियमांचा आतापर्यंत सर्वाधिक मोठा फटका सहन करणारा संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका. १९९२च्याच विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत ४५ षटकांत २५३ धावांचा पाठलाग करताना अखेरच्या १३ चेंडूंत आफ्रिकेला २२ धावांची आवश्यकता होती. मात्र त्यानंतर १० मिनिटांसाठी झालेल्या पावसाच्या वर्षांवामुळे आफ्रिकेपुढे अवघ्या एका चेंडूंत २२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवण्यात आले व पहिल्यांदाच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याची त्यांची संधी हुकली. त्याचप्रमाणे २००३च्या विश्वचषकातील साखळीतील अखेरच्या सामन्यात २७० धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेने ४५ षटकांत सहा बाद २२९ धावा केल्या असताना पावसाचे आगमन झाले आणि डकवर्थ-लुइसनुसार आफ्रिकेची धावसंख्या अपेक्षित धावसंख्येइतकीच असल्याने सामना ‘टाय’ म्हणून घोषित करण्यात आला.

१९९९च्या विश्वचषकात सर्वप्रथम डकवर्थ-लुइसचा अवलंब करण्यात आला. मात्र त्या विश्वचषकात एकाही सामन्याचा या पद्धतीनुसार निकाल लागला नाही. मात्र २००३च्या विश्वचषकातील दुसऱ्याच सामन्यात डकवर्थ-लुइसचा अवलंब करण्यात आला. यंदाच्या विश्वचषकात तीन सामन्यांत या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. मात्र विश्वचषकाच्या १२व्या पर्वातही डकवर्थ-लुइस पद्धतीचे धक्के सुरूच असून, सर्वसामान्य चाहते या गणिती पद्धतीबाबत फक्त आश्चर्यच व्यक्त करताना दिसतात.

डकवर्थ-लुइस म्हणजे नक्की काय?

इंग्लंडमधील दोन महान सांख्यिकीतज्ज्ञ फ्रँक डकवर्थ आणि टॉनी लुइस यांनी १९९७मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड सामन्यांद्वारे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये या पद्धतीची सुरुवात केली. त्यांच्याच नावावरून डकवर्थ-लुइस असे नाव या पद्धतीला पडले. पुढे नोव्हेंबर २०१४मध्ये प्रा. स्टीफन स्टर्न यांनी या नियमात काही बदल सुचवल्यामुळे त्यांच्याही नाव जोडून ‘डकवर्थ-लुइस- स्टर्न (डीएलएस) पद्धती’ असे नाव पडले. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या डावात या पद्धतीचा अवलंब करताना फलंदाजी करणाऱ्या संघाचे किती गडी बाद झाले आहेत, किती षटके शिल्लक आहेत, त्यांच्याकडील उपलब्ध फलंदाजांची फळी आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची धावगती यांचा आढावा घेऊन सुधारित लक्ष्य ठरवले जाते. पहिल्या डावात मात्र फक्त षटके किती कमी करावी, यावरच अधिक भर दिला जातो.