टाटा उद्योग समूह या देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाचे मागील जवळवजळ तीन दशकांपासून नेतृत्व करत असणाऱ्या रतन टाटा यांनी एक खंत व्यक्त केली आहे. देशातील सर्वात दानशूर आणि माननिय उद्योजकांच्या यादीमध्ये ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा रतन टाटा यांनी वयाच्या ८२ व्या वर्षी एक खंत बोलून दाखवली आहे. वास्तुरचनाकार (आर्कीटेक्ट) म्हणून आपल्याला जास्त काळ काम करता आलं नाही, याबद्दल टाटा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जगभरातील कॉर्पोरेट आणि स्टार्टअप व्यावसायिकांना एकत्र आणणाऱ्या ‘कॅपगिनी’ या अमेरिकन कंपनीने ‘भविष्यातील बांधकाम आणि आराखडा’ या विषयावर आयोजित केलेल्या वेबमिनारमध्ये टाटा सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ही खंत बोलून दाखवली. मला वास्तुरचनाकार म्हणून फार काळ काम करता आलं नसलं तरी वास्तुरचनेमधून प्रस्तूत होणारा मानवतावाद मला उमगला असं टाटांनी यावेळी सांगितले. “मला वास्तुरचनाकारच व्हायचं होतं. कारण वास्तुरचनेच्या माध्यमातून मानवतावादचे दर्शन होते. वास्तुकलेमुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत आली. मला या क्षेत्रासंदर्भात खूप आवड आहे. मात्र मी इंजिनियर व्हावे असं माझ्या वडिलांना वाटत होतं. म्हणून मी दोन वर्षे इंजिनियरिंग केलं. मात्र या दोन वर्षांमध्ये मी वास्तुरचनाकार व्हायला हवं, मला या गोष्टीची आवड आहे हे जाणवू लागलं,” असं टाटांनी सांगितलं.

रतन टाटा यांनी १९५९ साली कॉर्नेल विद्यापीठामधून स्थापत्यशास्त्राची पदवी संपादित केली आहे. “पदवी घेतल्यानंतर मी दोन वर्षे लॉस एंजलिसमधील एका वास्तुरचनाकाराकडे काम करत होतो. त्यानंतर मी भारतात परत आलो आणि फॅमेली बिझनेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ती दोन वर्षे वगळता मी माझे संपूर्ण आयुष्य वास्तुरचना क्षेत्राच्या बाहेरच घालवले. वास्तुरचनाकार असल्याबद्दल मला कधीही खंत वाटली नाही. मात्र अधिक काळ मला ते काम करता आलं नाही याची खंत नक्की आहे,” असं टाटा यांनी सांगितले.

“वास्तुरचनाकार होताना अनेक गोष्टी शिकवल्या जातात यामध्ये एखादी वास्तू उभी करताना संवदेनशीलता कशी वापरावी, वेगवेगळ्या गोष्टींचा मेळ कसा घडवून आणावा, उपलब्ध करुन दिलेल्या निधीमध्ये एखादी वास्तू कशी उभी करावी यासारख्या अनेक गोष्टी वास्तुरचनाकार होताना शिकवल्या जातात. असं असूनही एखादी व्यक्ती वास्तुरचनाकार म्हणून काम करु शकली नाही असं सांगत असेल तर ते चुकीचे आहे असं मी म्हणणे,” असं मतही टाटा यांनी व्यक्त केलं.