नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी असल्याचं देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. तसेच सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. “योगी गुन्हेगारांविरोधात कडक शिक्षा देतात, त्यामुळे त्यांचं नाव ऐकून गुन्हेगार घाबरतात. योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री नसते तर, मी माझ्या लखनऊ मतदारसंघाचा इतका विकास करू शकलो नसतो,” असंही सिंह म्हणाले.

राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी लखनऊमध्ये १७१० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय आणि आरोग्य, स्मार्ट सिटी मिशन, सेतू निगम आणि सिंचनाच्या १८० योजनांचा समावेश आहे. यावेळी बोलताना सिंह म्हणाले की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात झालेली विकासकामे कौतुकास्पद आहेत.  दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ हा दोघांची अप्रतिम जोडी देवाने बनवली आहे. या दोघांनी केंद्रात आणि राज्यात सुरू केलेल्या कल्याणकारी योजना राबवणं सोपी गोष्ट नाही.

संरक्षण मंत्री सिंह यावेळी म्हणाले की, “संरक्षण मंत्रालय अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) लखनऊजवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करेल आणि या संदर्भात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी एका महिन्यात २५० एकर जमीन उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.”  तर, या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार संपूर्ण राज्याचा विकास करेल आणि कोणत्याही आघाडीवर मागे राहणार नाही.”