भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी कोणत्याही खेळाडूच्या दुखापतीबद्दल नसून, कर्णधार विराट कोहलीच्या जीवाला असलेल्या धोक्याबद्दलची आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIA च्या हाती यासंदर्भातली काही कागदपत्र लागली आहेत. ABP News वृत्तवाहिनीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. केरळ मधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या High Power Committee ने देशभरातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत सर्वात शेवटी विराट कोहलीचंही नाव आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या यादीत विराट कोहलीचं नाव कोणत्या कारणामुळे आलं याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाहीये. दरम्यान जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा हे नाव भारतात नवीन असलं तरीही याची सुत्र ही पाकिस्तानमधूनच हलवली जात असल्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. मात्र दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम झाल्यामुळे, विराट कोहली आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींना भारतामधील अतिरेकी संघटना धमकी देत असल्याचं चित्र उभं करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. भविष्यकाळात भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास संशयाची सूई आपल्याकडे न येण्यासाठी पाकिस्तानचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं मत आहे. दरम्यान या हिटलिस्टनंतर विराट कोहलीच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.