दिल्लीतील धुराने प्रदूषणाचे विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या १७ वर्षांमध्ये प्रथमच दिल्लीत इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली शहराला गॅस चेंबर म्हटले आहे. तर अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण यंत्रणेने भारतीय राजधानीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हटले आहे. धूराचे प्रमाण अतिशय जास्त असल्याने दिल्लीतील दोन रणजी सामनेदेखील रद्द करण्यात आले आहेत.

दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती सुधारताना दिसत नाही आहे. दिल्लीचा रहिवासी असलेला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीच्या प्रदूषणाविषयी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. दिल्लीतील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त करणारा हा व्हिडीओ विराटने इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. ‘मला दिल्लीतील प्रदूषणाची चिंता वाटते. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे,’ असे आवाहन विराट कोहलीने केले आहे.

 

 
भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. २९ वर्षानंतर पहिल्यांदाच भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. राजकोटमधील पहिल्या कसोटीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. विराट कोहलीने पूर्णवेळ कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर भारताने चार कसोटी मालिकांमध्ये सलग विजय मिळवले आहेत. ऑगस्ट २०१५ मध्ये विराटने भारताच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाची धुरा खांद्यावर घेतली होती.