हैदराबादच्या चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ५.३० वाजता चारमिनारजवळील एका दागिन्याच्या दुकानात आग लागली. तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे दुकान आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या ११ गाड्यांनी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी जे सांगितलं ते ऐकून तुमच्याही काळजात धस्स होईल यात शंकाच नाही.

जहीर नावाच्या प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?

१७ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी मी जे पाहिलं ते विसरुच शकत नाही. एका महिलेने आगीपासून वाचण्यासाठी दोन मुलांना मिठीत घेतलं. माय लेकरांची ती भेट शेवटची ठरली. कारण आगीत आई आणि तिची ही मुलं होरपळून गेली त्यांचा मृत्यू झाला. माझ्यासह अनेक जण आग नियंत्रणात यावी म्हणून प्रयत्न करत होतो. त्यावेळी हे दृश्य मी पाहिलं जे माझ्या डोळ्यांसमोरुन जात नाही. आईने मुलांना मिठी मारली. पण ती त्यांची शेवटची भेट ठरली. या तिघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

इमारतीत अचनाक आग लागल्याने जागा आणि अरुंद असल्याने अनेक अडचणी

आग अचानक लागल्याने आणि या इमारतीतली जागा अरुंद असल्याने आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागत होता. ही इमारत खूप जुनी आहे. इमारतीच्या वरच्या भागातही खोल्या आहेत. दुकानांच्या रांगेच्या वर खिडक्या आहेत. त्यातल्या अनेक खिडक्या एसी लावल्याने बंद करण्यात आलेल्या आहेत. आग लागल्याने छोट्या खोल्यांमध्ये धूर साठणं ही अगदीच साहजिक गोष्ट ठरली आहे कारण या इमारतीत प्रवेश करायचं प्रवेशद्वारही लहान आहे असंही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. जहीरने सांगितलं इमारतीला आग लागली त्यानंतर आत जाणं खूप कठीण होतं. तरीही आम्ही १३ जणांना कसंबसं बाहेर काढलं. धूर इतका वाढला होता की आम्हाला दिसतही नव्हतं. आत जाण्यासाठी आम्ही भिंतही पाडली. मात्र अनेकांचा मृत्यू जळून झाला. तर अनेकांचा श्वास धूर वाढल्याने कोंडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी. किशन रेड्डी काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. ते म्हणाले, तळमजल्यावर एका कुटुंबाच्या मालकीचे दागिन्यांचं दुकान होतं. तर हे कुटुंब वरच्या मजल्यावर राहत होते. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी आहेत. या घटनेबद्दल मला कुणालाही दोष द्यायचा नाही. परंतु हैदराबाद शहर हे वेगाने विकसित होत असल्याने आता पोलीस, महानगरपालिका, अग्निशमन दल आणि वीज विभागालाही स्वतःमध्ये बदल करावे लागतील.