विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अजून एक धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतीमुळे संघातून बाहेर पडल्याने भारतीय संघासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवालला बोलवण्यात आलं असल्याची माहिती आहे. नेट प्रॅक्टिस करत असताना जसप्रीत बुमरहाचा बॉल विजय शंकरच्या पायाला लागला होता. सुरुवातीला ही गंभीर दुखापत नसल्याचं सांगत विजय शंकर पुनरागमन करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र ही दुखापत गंभीर असून विजय शंकरला विश्रांती देण्यात आली आहे.
BCCI: Vijay Shankar sustained a non displaced fracture of the left big toe, which will require a minimum of three weeks to heal. The injury rules him out of the ongoing World Cup. The Indian team management has requested the ICC to consider Mayank Agarwal as his replacement. https://t.co/HJhswyLmkn
— ANI (@ANI) July 1, 2019
बीसीसीआयने आयसीसीकडे विजय शंकरच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यासाठी औपचारिक विनंती केली आहे. ‘विजय शंकर याच्या घोट्याला पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहचा बॉल लागला आहे. त्याची दुखापत गंभीर असून तो विश्चचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याला पुन्हा घरी पाठवण्यात येत आहे’, अशी माहिती एका बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.
‘भारतीय संघ व्यवस्थापन मयांक अग्रवालला संधी देण्याची शक्यता आहे. मयांक अग्रवाल ओपनिंग फलंदाज असल्याने तो के एल राहुलची जागा घेऊ शकतो. जर पुढील दोन सामन्यांमध्ये ऋषभ पंत चांगली खेळी करु शकला नाही तर के एल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाऊ शकतं’, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मयांक अग्रवाल याने ऑस्ट्रेलिया संघाविरोधात कसोटी सामन्यात खेळत भारतीय संघात पदार्पण केलं होतं. पण अद्याप त्याला एकदिवसीय संघात संधी मिळाली नव्हती. मात्र आता थेट विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी त्याच्याकडे चालून आली आहे.
विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा विजयरथ रोखला आहे. आता भारताचा सामना बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत होणार आहे. सेमी फायनलमध्ये आपलं स्थान नक्की करण्यासाठी भारताला बांगलादेशचा पराभव करणं गरजेचं आहे. २ जुलै रोजी हा सामना पार पडणार आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी भारत आणि श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहे.