दिवाळीतील नरक चतुर्दशी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. काही वेळा हा दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी येतो, परंतु यंदा तो वेगळा आला आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांच्या आंघोळी असतात. या दिवशी घरातील महिला पुरुषांना तेलाने मालिश करतात. कणकेच्या दिव्याने ओवाळतात आणि उटणे लावून आंघोळही घालतात. यावेळी लावण्यात येणारे तेल हे नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन यासाठी असते मानले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते. जो कोणी हे करणार नाही तो नरकात जातो असे म्हटले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. शेतकऱ्यांकडे या सणाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही अस्मानी संकटात शेती व्यवसाय धोक्यात येऊ नये, पिकाचे नुकसान होऊ नये, पशुधन सुरक्षित निरोगी राहावे यासाठी धरणीमाता आणि गोमातेची प्रार्थनाही केली जाते. शेतकऱ्यांच्या घरात पहिले पीक आल्यामुळे काही शेतकरी या दिवशी धान्याचीही पूजा करतात. महाराष्ट्रातील काही ठिकाणी सूर्योदयापूर्वी गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करुन त्यामध्ये तिळाचे तेल टाकून दिवा पेटवला जातो. यावेळी पूर्वेकडे तोंड करून अक्षता, फुलांनी पूजा केली जाते. या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते असेही म्हटले जाते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता. दिवाळीतील या महत्त्वाच्या दिवशी स्त्रिया घराबाहेर रांगोळी काढून दारात आणि अंगणात पणत्या लावतात. तसेच या काळात एकमेकांकडे फराळाला जाण्याची आणि फटाके उडविण्याचे परंपरा आहे.