चैतन्य प्रेम

पैठण म्हणजे प्रतिष्ठान. सातवाहनांची राजधानी असलेली ही नगरी म्हणजे संस्कृत भाषा आणि विद्येचं प्रतिष्ठानच होती. त्या पैठणमध्ये शके १४५०च्या सुमारास एकनाथ महाराजांचा जन्म झाला. वडील सूर्यनारायण आणि आई रुक्मिणीबाई यांचं छत्र जन्मानंतर थोडय़ाच दिवसांत हरपलं. एकनाथांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. मात्र वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच एकनाथांची गंभीर वृत्ती प्रत्ययाला येऊ लागली होती. ते इतर लहान मुलांच्या खेळांत रमत नसत. त्याऐवजी एखाद्या निर्जन स्थानी एकटय़ानंच शांतपणे बसावं किंवा कुठल्या तरी विचारात गढून जावं, हेच त्यांना भावत असावं. लहानपणीच घरी संस्कृतचं शिक्षण झालं. रामायण, महाभारत आदी ग्रंथांचा अभ्यास सुरू झाला आणि त्या मुळच्या चिंतनाला अधिकच जोर आला. एकदा शिवमंदिरात ध्यानस्थासारखे बसले असताना देवगिरी येथे सद्गुरूकडे जाण्याची प्रेरणा त्यांच्या मनात अचानक उसळून आली. देवगिरी हे नाव मनात कसं आलं, हे सांगता येत नाही. नियतीचीच ती योजना होती, हे मात्र पुढील घटनाक्रमांवरून स्पष्ट झालं. मनात आलेला तो विचार इतका तीव्र होता की कशात समाधान वाटेना. घरी थांबवेना. मग कुणालाही काहीही न सांगता ते देवगिरीकडे निघाले आणि तिथं सद्गुरू जनार्दनस्वामी यांच्या चरणांपाशी त्यांना आध्यात्मिक ओढीनं नेऊन पोहोचवलं. इतक्या लहान मुलाच्या मनात अध्यात्माची खरीच ओढ आहे का, याची तपासणी जनार्दन स्वामी यांनी केली आणि जेव्हा एकनाथांच्या मनातली शुद्ध ओढ, प्रेमार्त भाव जाणवला तेव्हा ‘एका जनार्दनी’ ही भक्तीपंथावरील अमीट अशी नाममुद्रा जन्माला आली. सद्गुरू आणि शिष्य यांचं इतकं ऐक्य की दोघांची नावं वेगवेगळी घेतली तरी अपूर्ण वाटतील. किंवा कुणाही एकांचं नाव घेतलं तरी दुसरं नाव पडसादाप्रमाणे आपोआप मनात उमटून जाईल! इतक्या आंतरिक ऐक्यतेचा आदर्श या सद्गुरू आणि त्यांच्या परमशिष्याच्या निमित्तानं साधकांच्या अनंत पिढय़ांसमोर कायम राहिला आहे. एकनाथांनी जनार्दन स्वामींची जी अनन्य सेवा केली ती एका अभंगातही आली आहे. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘सेवेची आवडी। विराम नाही अर्धघडी।। १।। नित्य करिता गुरुसेवा। प्रेम घडीभर होत जीवा।। २।। आळस येतोचि सरला। अराणुकेचा ठावो गेला ।।३।। तहान विसरली जीवन। भूक विसरली मिष्टान्न।। ४।। जांभईसी वाव पुरता। सवड नाहींची तत्त्वतां।। ५।। ऐसे सेवे गुंतले मन। एका जनार्दनी शरण।।६।।’’ गुरुसेवेची अशी आवड मनात सतत होती की अर्धा क्षणही विराम नव्हता. सेवारत शिष्याला सेवेत विरामाची इच्छाच नव्हती. गुरुसेवेत जो नित्य रत असतो त्यालाच घडोघडी खऱ्या प्रेमाची जाणीव होऊ लागते. आळस कायमचा सरला. ‘अराणुकेचा ठावो गेला’.. आराणुक म्हणजे समाधान. तर आळशी ‘आरामा’ची इच्छाच उरली नाही. तहान जणू पाण्याला आणि भूक अन्नाला विसरली. जांभईलाही सवड उरली नाही. अशा रीतीनं एकनाथाचं मन सेवेत गुंतलं आणि शरणागत झालं! हिला ‘सेवा’ तरी कसं म्हणावं?आपला हात दुखत असेल, तर दुसरा हात आपोआप तो चेपू लागतो. त्यात किती सहज ऐक्य असतं! चेपणाऱ्या हाताला चेपण्याचे कष्ट लेशमात्रही जाणवत नसतात. कारण शेवटी दोन्ही एकाचेच असतात. तसं हे आत्मिक ऐक्य आहे.