– चैतन्य प्रेम

यदुराजानं अवधूताला त्याच्या आनंदाचं रहस्य विचारलं आहे. यदु कोणी सामान्य राजा नव्हता. हजारो राजे आले आणि गेले, पण विरक्तीचं मोल उमजून जो रयतेच्या कल्याणासाठीच राज्य करतो तोच खरा राजा. राजाला जात नसते, तो सर्वाचाच असतो. पण हे – न सांगता-  ज्याच्या राजवटीत प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं त्याचीच नाममुद्रा अमीट असते. यदु असा कल्याणकारी राजा होता. अवचित त्याची अवधूताशी गाठ पडली. अवधूत हा विरक्त आत्मयोगी संन्यासी होता. तरीही त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं तेज होतं. अंगप्रत्यंगातून जणू तो आनंद ओसंडत होता. तो आनंद पाहून यदुला विस्मय वाटला. या आनंदाचं कारण त्याला जाणून घ्यावंसं वाटलं आणि मोठय़ा विनयानं त्यानं अवधूताला, आपण आनंदी कसे आहात आणि मला तो आनंद कसा प्राप्त होईल, असं विचारलं. अमाप वैभव पायाशी असलेल्या राजानं एका कफल्लक संन्याशाला विनयानं आनंदप्राप्तीचा उपाय विचारला आहे! ही या भूमीची खरी ओळख आहे हो. इथल्या खऱ्या फकिराला कसली फिकीरच नाही आणि खऱ्या राजाला आनंदाची भीक मागण्यात कमीपणा नाही. या प्रश्नाच्या उत्तरात अवधूतानं भवतालच्या प्रत्येक गोष्टीनं मला आनंदाचा पाठ शिकवला, असं सांगितलं. आपल्या अवतीभवतीची प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी जीवनदृष्टीच देत असते हो! ती गवसली पाहिजे. गोंदवल्याला कृष्णाच्या आई होत्या ना? त्या म्हणाल्या की, ‘‘प्रत्येक गोष्टीतून महाराज काही तरी शिकवत आहेत, या नजरेनं पाहा तरी, मग प्रत्येक गोष्टीत अध्यात्म आहे!’’ त्यांनी अगदी साधं सोपं उदाहरण दिलं ते पंख्याचं. वीज गेली की पंखा फिरायचा थांबतो. उकडायला लागतं. वीज येताच तो गरगरा फिरू लागतो आणि जीवाला बरं वाटतं! तसं  सद्गुरुभक्तीची ऊर्जा नसेल, तर पंखा फिरत नाही. सत, रज आणि तम या तीन गुणांची पाती स्थिरावतात आणि अहंभावाच्या तापानं नकोसं होतं. पण एकदा का भक्तिरूपी ऊर्जेचा प्रवाह सुरू झाला की तिन्ही पाती अशी फिरत राहतात की, ती दिसेनाशीच होतात आणि आनंदाचा वारा जीव तृप्त करतो! तर माणूस भवतालच्या प्रत्येक गोष्टीतून असं काही ना काही शिकू शकतो, हे अवधूतानं राजाला सांगितलं. इतकंच नाही, तर अशा चोवीस जणांचं त्यानं दर्शन घडवलं. हेच अवधूताचे २४ गुरू. एका राजाला ही जाणीव करून देत त्याची दृष्टी अवधूतानं किती व्यापक केली आहे, हे पाहण्यासारखं आहे. अवधूत हा जर बाजारू गुरू असता तर राजानं केलेल्या स्तुतीनं शेफारला असता. आपण स्वबळावर आनंद प्राप्त केलाय, या भावनेनं तो संकुचित झाला असता. अवधूत हे करू शकत होता. सहज तो राजाचा निकटस्थ ठरून आयुष्यभर भौतिक सुखात लोळत पडला असता, पण अवधूतानं तसं केलं नाही. मी आनंदी आहे कारण या जगातल्या प्रत्येक गोष्टीनं माझ्याकडून आनंदाचा पाठ गिरवून घेतला आहे, हीच त्याची भावना होती. म्हणून त्यानं राजाला एकेकाची ओळख करून दिली. जनतेला दु:खात ढकलून राजा आनंदात राहूच शकत नाही हे जितकं खरं; तितकंच प्रत्येक गोष्टीच्या अस्तित्वाचं खरं मोल जाणल्याशिवाय त्याच्या राज्यकारभारातही संतुलन साधत नाही, ही सुप्त शिकवण त्यात आहे. जगात फक्त चांगलं आणि फक्त वाईट असं काही नसतं. वाईट गोष्टीतूनही चांगल्याचं महत्त्व माणूस शिकू शकतो, हेच अवधूतानं काही गुरूंच्या उदाहरणांतून सांगितलं आहे. त्यातले ११ गुरू आपण आतापर्यंत पाहिले. आता बारावा गुरू आहे भ्रमर!