– चैतन्य प्रेम

जोवर इंद्रियांचं नियमन होत नाही, रसनेवर ताबा येत नाही तोवर मनाची उच्छृंखल प्रवृत्ती ओसरत नाही. त्यासाठी नेमकं काय करावं, हे मात्र साधकाला स्वबळावर आणि स्वबुद्धीनं उमजत नाही. तो मग स्वत:च्या कल्पनेनुसार, आकलनानुसार प्रयत्न करतो; पण ते कधी कधी अवास्तव आणि टोकाचे ठरतात. त्यानं विषयगोडी शमण्याऐवजी अधिकच तीव्र होण्याचा धोका असतो. एका साधकानं या चिंतनाला चपखल असे गीतेतले श्लोक लक्षात आणून दिले, तर आणखी एका साधकाने श्रीतुकाराम महाराज यांच्या अभंगाची आठवण दिली. इंद्रियांचं नियमन, आंतरिक प्रवृत्तींचं नियमन हा योगाभ्यासच आहे. हा अभ्यासही योगाइतकाच संतुलित हवा. गीतेच्या सहाव्या अध्यायात याचंच स्मरण करून देत भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की, ‘‘नात्यश्नस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नत:। न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चाजुर्न।।१६।।’’ म्हणजे, कृष्ण म्हणत आहेत की, ‘‘हे अर्जुना, जो अतिशय प्रमाणाबाहेर खातो किंवा अतिशय अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसं झोपतच नाही, तो योगी होण्याची शक्यता नाही!’’ अन्न हे देहधारणेसाठी आवश्यक आहे. पण म्हणून ते गरजेपेक्षा अधिक खाणं म्हणजे देहाच्या पचन आदी यंत्रणेवर ताण आणणंच आहे. तीच गोष्ट झोपेची. सर्वसामान्य माणसाला किमान सहा तास झोप आवश्यक आहे. वयपरत्वे हे प्रमाण कमी-अधिक होऊ शकतं. पण हे प्रमाण दुर्लक्षित करून खूप कमी वा खूप अधिक झोप घेतली तरी देहावर परिणाम होतो. पुढे कृष्ण म्हणतात की, ‘‘युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा।। १७।।’’ म्हणजे, ‘‘जो मनुष्य आपल्या आहार, निद्रा, विहार आणि कर्म करण्याच्या सवयींमध्ये नियमित असतो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दु:ख दूर करू शकतो.’’ आता हा काही चमत्कार नव्हे. आपली अनेक दु:खं ही आपल्या अनिर्बंध सवयींमुळेच आपल्या वाटय़ाला आलेली असतात. जर त्या सवयी बदलल्या आणि जगण्यात शिस्त आली तर देहाच्या अनेक तक्रारी, कुरबुरी थांबतील. पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे. ती ही की, इंद्रियभोगांचा त्याग घडला, तरी गोडी पूर्णपणे ओसरतेच असं नाही. त्यासाठी त्यागापेक्षा कोणत्या तरी श्रेष्ठ गोष्टीची जोड द्यावी लागते. भगवान कृष्णही दुसऱ्या अध्यायात म्हणतात की, ‘‘विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिन:। रसर्वज रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते।।५९।।’’ म्हणजे, ‘‘देहधारी जीवात्मा जरी इंद्रियभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच. परंतु श्रेष्ठ अनुभूतीनं तो त्या गोडीतून पूर्णपणे निवृत्त होतो.’’ आता ही श्रेष्ठ अनुभूती काही त्याच्या आवाक्यातली गोष्ट नाही. त्यासाठी विषयी मन आणि निर्विषय परमात्मा या दोहोंमध्ये सद्गुरू उभा ठाकला पाहिजे! संत तुकाराम महाराज म्हणूनच सांगतात की, ‘‘माझे मज कळों येती अवगुण। काय करूं मन अनावर।।१।। आतां आड उभा राहें नारायणा। दयासिंधुपणा साच करीं।।ध्रु.।। वाचा वदे परी करणें कठीण। इंद्रियां अधीन जालों देवा।।२।। तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास। न धरीं उदास मायबापा।।३।।’’

chaitanyprem@gmail.com