पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. रानीबंद येथील सभेला संबोधित करताना शाह यांनी ममता सध्या व्हीलचेअरवरुन फिरत असल्याचा संदर्भ देत त्यांना त्यांच्या पायची काळजी आहे पण हत्या झालेल्या भाजपाच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांची नाहीय, अशी टीका केली आहे. शाह हे दोन दिवसाच्या आसाम आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. रानीबंदमधील मतदारांशी संवाद साधताना शाह यांनी ममता यांच्यावर दुखापतीवरुन टीका केलीय.

“ममताजींच्या पायाला दुखापत झाली आहे मात्र ती कशी झाली ठाऊक नाही. तृणमूल काँग्रेस यामागे कट असल्याचं सांगत आहे. मात्र निवडणूक आयोगाने हा अपघात असल्याचं म्हटलं आहे. दीदी तुम्ही सध्या व्हिलचेअरवर फिरताय. तुम्हाला तुमच्या पायाची चिंता आहे. मात्र तुम्हाला हत्या झालेल्या माझ्या (भाजपाच्या) १३० कार्यकर्त्यांच्या मातांना होत असणाऱ्या दु:खाबद्दल काहीच वाटलं नाही,” असा टोला शाह यांनी भाषणामध्ये लगावला आहे.

यापूर्वी झारग्राममधील सभेमध्ये बोलताना शाह यांनी केंद्राच्या योजना पश्चिम बंगालमध्ये न येण्यासाठी राज्यामध्ये सत्तेत असणारं ममता बॅनर्जी सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. “एक काळ असा होता जेव्हा बंगाल अध्यात्म आणि स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करत होता. वंदे मातरम गाण्याने भारताला एकत्रित आणण्याचं काम केलं. आता मात्र बंगालमध्ये गुंडाराज आहे. मोदी सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहचत नाहीय. यामध्ये सर्वात मोठा अडथळा हा तृणमूल काँग्रेस सरकारचा आहे,” असं शाह म्हणाले.

बंगालमध्ये मागील दहा वर्षांपासून तृणमूल काँग्रेसचे सरकार असून त्यांनी राज्याला पाताळापेक्षाही भयंकर अवस्थेत नेण्याचं काम केलं आहे, असा टोलाही शाह यांनी लगावला. “प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार, टोलेबाजी, राजकीय हिंसाचार, घुसखोरी असल्याने बंगालचा विकास झालाच नाही. हिंदूंना, आदिवासींना त्यांचे सण साजरे करण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागतेय, अशी स्थिती निर्माण झालीय. मोदी सरकारने मागील १० वर्षांमध्ये दीदींची सत्ता असताना ११५ हून अधिक केंद्रीय योजना आदिवासी आणि इतर गरजूंसाठी राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या. मात्र या योजना तुमच्या पर्यंत पोहचल्या नाहीत. असं सरकार तुमच्या (सर्व सामान्यांच्या) काय कामाचं आहे?,” असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला.