अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज अमित शाह यांनी सभा घेतली. या सभेत भाषण करताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा उल्लेख नकली शिवसेनेचे प्रमुख असा केला. काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अमित शाह यांनी टीका केली. उमेश कोल्हेंची हत्या झाली पण सो कॉल्ड हिंदू हितरक्षक उद्धव ठाकरेंनी.. "अमरावतीत उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आली. तरीही सो कॉल्ड हिंदू हितरक्षक उद्धव ठाकरेंनी त्यावेळी काहीच केलं नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे सगळे संस्कार सोडले. मी उपस्थितांना सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि संस्कार पुढे घेऊन गेले आहेत. महाराष्ट्रात आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असं आमचं सरकार आहे. आमच्या राज्यात कुठल्याच उमेश कोल्हेंची हत्या होऊ शकत नाही, कुणाची हिंमतच होणार नाही." असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. अमित शाह यांनी केलं महत्त्वाचं आवाहन २६ तारखेच्या दिवशी कमळ चिन्हाचं बटण दाबा हे आवाहन मी तुम्हाला सगळ्यांना करतो आहे. अमरावतीत दाबलेल्या कमळाच्या बटणाचा करंट इटलीत लागेल अशा पद्धतीने मतदान करा असं म्हणत अमित शाह यांनी सोनिया गांधींना टोला लगावला. तसंच तुमचं प्रत्येक मत हे देशाला दहशतवादापासून आणि नक्षलवादापासून मुक्त करण्यासाठी देत आहात हे विसरु नका. १० वर्षांत मोदींनी विकासाची भरपूर कामं केली आहेत, येत्या पाच वर्षांतही काम करणार आहेत. काही कामं अशी आहेत जी फक्त मोदीच करु शकतात असंही अमित शाह म्हणाले. हे पण वाचा- उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी, “भाकड जनता पक्षाचा नवा सिझन आलाय जुमला तीन, अभिनेता तोच, व्हिलन आणि..” नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने… "मोदी सरकारने अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं, काँग्रेसवाल्यांनी सत्तर वर्षे राम मंदिराचं काम अडकवून ठेवलं होतं. मोदींनी पाच वर्षात राम मंदिराची केसही जिंकली, भूमिपूजनही केलं आणि मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली. स्वतःला शिवसेनेचे अध्यक्ष मानत आहेत अशा उद्धव ठाकरेंनाही प्राणप्रतिष्ठेसाठी निमंत्रण देण्यात आलं. मात्र नकली शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींच्या भीतीने अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही प्रकृती बरी नसल्याचं सांगत येणं टाळलं. आता निवडणुकीच्या प्रचारात कसे काय फिरत आहेत? काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही आम्ही निमंत्रण दिलं होतं. काँग्रेसने राम मंदिराचं काम थांबवून तर ठेवलंच होतं, पण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न येऊन प्रभू रामचंद्रांचा अपमान केला. असंही अमित शाह म्हणाले.