उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजपसाठी ‘स्कॅम’विरोधातील (समाजवादी पक्ष, काँग्रेस, अखिलेश, मायावती) लढाई असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते रविवारी उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी मोदी यांनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात काढण्यात आलेल्या रथयात्रेत काँग्रेस पक्ष समाजवादी पक्षाच्या कारभारावर टीका करत होता. मग, आता असे काय घडले की हे पक्ष अचानकपणे एकत्र आले. राजकारणात मी अनेकांना एकत्र येताना बघितले. मात्र, गेली काही दशके सातत्याने एकमेकांना संपविण्याचा प्रयत्न करणारे पक्ष आज गळ्यात गळे घालून वाचवा वाचवा, असा धावा करत आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. मात्र, जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत, ते उत्तर प्रदेशला काय वाचवणार, अशी टीका मोदी यांनी केली. तुम्हाला उत्तर प्रदेशचे भाग्य बदलायचे असेल, तर येथील सरकार बदलण्याची गरज आहे, असे सांगत मोदींनी उत्तर राज्याच्या मतदारांना भाजपला सत्ता देण्याचे आवाहन केले. येथील राज्य सरकार हेच उत्तर प्रदेशच्या विकासातील प्रमुख अडथळा आहे. मात्र, मला दिल्लीतून उत्तर प्रदेशला मदत करण्याची कितीही इच्छा असली तरी राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे हा पैसा दुसरीकडेच जातो, असा आरोप मोदी यांनी केला.

https://twitter.com/ANINewsUP/status/827804888482484224

यावेळी मोदींनी राजकारणासाठी उत्तर प्रदेशच्या विकासात अडथळे आणले जात असल्याचेही सांगितले. आरोग्य सेवांसाठी केंद्राकडून उत्तर प्रदेशला चार हजार कोटींचा निधी देण्यात आला होता. मात्र, त्यापैकी २५० कोटींचाही निधी अजूनपर्यंत खर्च झालेला नाही. त्यानंतर आम्ही ही रक्कम सात हजार कोटींपर्यंत नेली तरी राज्य सरकारने त्यापैकी केवळ २८० कोटी रूपयेच खर्च केले. समाजवादी पक्षाचे सरकार सर्व गोष्टींकडे मतपेटीच्या दृष्टीकोनातूनच बघत असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.