भाजपात गेलेल्या माझ्या मुलाचा पराभव झाला पाहिजे असं वक्तव्य ए. के. अँटनी यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीत एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. आपण कसे जिंकून येऊ हे उमेदवार छातीठोकपणे सांगत आहेत. अशात ए.के. अँटनी यांनी त्यांच्या मुलाबाबत हे वक्तव्य केलं आहे. अनिल अँटनी हे भाजपात गेले आहेत, केरळमधून निवडणूक लढवत आहेत. मात्र माझी इच्छा आहे की त्यांचा पराभव झाला पाहिजे असं ए.के. अँटनी म्हणाले आहेत. इंडिया आघाडी पुढे जाते आहे, भाजपा खाली जाते आहे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे असंही अँटनी यांनी म्हटलं आहे. इंडिया आघाडी आणि आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात लढतो आहे. माझ्या मुलाने म्हणजेच अनिलने भाजपात जाऊन चूक केली. त्याचा पराभव झाला पाहिजे असं आता ए.के. अँटनी म्हणाले आहेत. अनिल अँटनी दक्षिण केरळ लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने एंटो अँटनी यांना उमेदवारी दिली आहे. ए के अँटनी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, "माझ्या मुलाच्या पक्षाचा पराभव झाला पाहिजे. त्याच्याविरोधात उभे असणारे काँग्रेस उमेदवार अँटो अँटनी विजयी व्हायला हवेत". यावेळी त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या मुलांनी भाजपात प्रवेश करणं चुकीचं असल्याचं सांगितलं. काँग्रेस पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवण्याची भूमिका घेताना पत्रकार परिषदेत ए के अँटनी यांनी सांगितलं की, "आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे".त्यांना मुलाच्या राजकारणाबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "काँग्रेस माझा धर्म आहे. काँग्रेसच्या मुलांनी भाजपात प्रवेश करणं आणि पळून जाणं चुकीचं आहे. जिथपर्यंत माझा प्रश्न आहे माझ्या राजकीय करिअरच्या सुरुवातीपासून मी कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवलं आहे".