लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशातच एबीपी आणि सी व्होटर्सचा सर्व्हे आला आहे. ज्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीची जादू चालणार असं चित्र आहे. एबीपी आणि सी व्होटर्स सर्व्हेनुसार २८ जागांवर महायुती तर २० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५+ चा नारा दिला आहे. अशात हा धक्कादायक अंदाज या पोलमधून समोर आला आहे. काय सांगतो एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हे? एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलनुसार, महायुतीमध्ये असणाऱ्या भाजपला २२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे. तर शिंदे गट आणि अजितदादा गटाला मिळून फक्त सहा जागा जिंकता येतील. म्हणजेच महायुतीच्या खासदारांची संख्या ही २८ असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याउलट महाविकास आघाडीत काँग्रेसचे चार खासदार विजयी होतील. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे मिळून एकूण १६ खासदार विजयी होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार महाविकास आघाडीचे २० खासदार निवडून येतील. असं घडलं तर भाजपाचं मिशन ४५+ चं स्वप्न भंगण्याची चिन्हं आहेत. २०१९ मध्ये काय होती परिस्थिती? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २३ जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ आणि काँग्रेसने १ जागा जिंकली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सगळी राजकीय समीकरणं बदलली. तसंच २०२२ नंतर त्या बदलत्या समीकरणांचा पुढचा अध्याय महाराष्ट्राने पाहिला. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं बंड त्यांचं सरकारमध्ये येणं, भाजपासह जाणं या सगळ्यामुळे भाजपाची एक जागा कमी होईल तर महायुतीला २८ जागांवर समाधान मानावं लागेल असं हा अंदाज सांगतो आहे. महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी आहे का? एबीपी माझा आणि सी व्होटरच्या ओपनियन पोलमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? यामध्ये महाराष्ट्रातील ४२ टक्के जनतेने आम्ही समाधानी आहोत, असे सांगितले आहे. तर २७ टक्के जनतेने आम्ही मोदींच्या कामगिरीवर काहीसे समाधानी आहोत, असे म्हटले आहे.