– अमोल परांजपे

सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा ऐकायला मिळते आहे ती ‘जी-२०’ची. बहुतांश मोठ्या शहरांमध्ये बॅनर झळकले आहेत, भिंती रंगवल्या गेल्या आहेत. केंद्र सरकारने वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणीच्या माध्यमातून भरपूर जाहिरातही केली आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांनी भारताकडे असलेले जी-२०चे अध्यक्षपद हे पथदर्शी ठरेल, असे भाकीत केले आहे. या आशावादामागे किती तथ्य आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जी-२० राष्ट्रगट म्हणजे नेमके’ काय?

परस्पर सहकार्य, व्यापारासाठी जगभरातील विकसित, औद्योगिकदृष्ट्या प्रगत आणि विकसनशील असे १९ देश आणि विसावा युरोपीय महासंघ यांचा एकत्र आलेला गट म्हणजे जी-२०. हा राष्ट्रगट भौगोलिक सीमांशी जोडला गेलेला नाही. (युरोपीय महासंघ, नाटो, सार्क हे राष्ट्रगट त्यांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार ठरले आहेत.) जी-२०मधील देशांत मिळून ८० टक्के सकल जागतिक उत्पन्न (ग्रॉस वर्ल्ड प्रॉडक्ट), ७५ टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार, दोन-तृतियांश (सुमारे ६६ टक्के) लोकसंख्या आणि ६० टक्के जमीन आहे. एका अर्थी सगळ्या जगाचा गाडा हाकणारे हे देश आहेत.

राष्ट्रगटाचा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया काय?

युरोपीय महासंघ वगळता प्रत्येक देशाला चक्राकार पद्धतीने एका वर्षासाठी अध्यक्षपद दिले जाते. १ डिसेंबर ते ३० नोव्हेंबर असा अध्यक्षपदाचा कालावधी असतो. अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी सदस्य देश पाच गटांमध्ये विभागण्यात आले आहेत. यातील गट १, गट २, गट ४ आणि गट ५मध्ये प्रत्येकी चार देश आणि गट ३मध्ये तीन देश आहेत. या गटांना क्रमाक्रमाने अध्यक्षपद दिले जाते. त्यामुळे अध्यक्षपद भूषविण्याची इच्छा असलेल्या देशाला आपल्या गटामधील इतर देशांना आपली क्षमता पटवून द्यावी लागते. काम अधिक सुरळीत व्हावे, यासाठी ‘ट्रॉईका’ हा छोटा गट असतो. यात माजी, विद्यमान अध्यक्ष आणि पुढल्या वर्षीचा नियोजित अध्यक्षाचे देश असतात.

भारताला यावर्षाचे अध्यक्षपद कसे मिळाले?

जी-२०च्या गट २मध्ये भारताचा समावेश आहे. भारतासह रशिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कस्तान हे देश या गटामध्ये आहेत. अन्य तीन देशांनी मंजुरी दिल्यानंतर १ डिसेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या काळासाठी अध्यक्षपद भारताकडे आले आहे. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या जी-२० राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षपदाचा प्रतीकात्मक हतोडा इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याकडून स्वीकारला.

भारताकडे आलेल्या अध्यक्षपदाचे वैशिष्ट्य काय?

वर्षभराच्या काळात भारतातील १५ शहरांमध्ये विविध विषय आणि विविध स्तरांवरील सुमारे १०० बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीमध्ये जी-२० राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद होईल. या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह सदस्य देशांचे तमाम राष्ट्रप्रमुख सहभागी होण्याची शक्यता आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक उपक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. २०२३ ‘कडधान्य वर्ष’ म्हणून साजरे करावे, असे आवाहन करण्यात आले असून त्यानिमित्ताने तृणधान्यांचे आरोग्यदायी महत्त्व, त्याचे गुण जगाला कळावेत हा उद्देश आहे.

‘ग्लोबल साऊथ’ ही संकल्पना काय आहे?

आपल्याकडे असलेले जी-२०चे अध्यक्षपद हे केवळ देशासाठी नव्हे, तर संपूर्ण ‘ग्लोबल साऊथ’साठी फायदेशीर ठरेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ‘ग्लोबल साऊथ’ म्हणजे आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील देश. यातील बहुसंख्य देश हे विकसनशील किंवा गरीब आहेत. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात या सर्वांचा आवाज विकसित देशांपर्यंत पोहोचविण्याचा मानस मोदी यांनी बोलून दाखविला आहे.

अन्य राष्ट्रगट आणि जी-२०मध्ये फरक काय?

जगभरात विविध देशांनी एकत्र येऊन अनेक राष्ट्रगट स्थापन केले आहेत. जी-७ हा त्यातील सर्वांत प्रभावी गट मानला जातो. जगातल्या सात सर्वाधिक विकसित देशांचा हा गट आहे. याखेरीज भारत सहभागी असलेले ‘ब्रिक्स’ (ब्राझिल, रशिया, इंडिया, चीन, दक्षिण आफ्रिका), शांघाय सहकार्य संघटना, ‘सार्क’ असे अनेक राष्ट्रगट आहेत. मात्र जी-२० या गटामध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटनसह युरोपीय महासंघ असल्यामुळे याचे महत्त्व अधिक मानले जाते.

जी-२० अध्यक्षपदाबाबत केंद्राच्या धोरणांवर आक्षेप काय?

एकीकडे केंद्र सरकारकडून जी-२० बैठका आणि परिषदांची जोरदार तयारी करण्यात येत असली तरी चक्राकार पद्धतीने आपोआप आलेल्या अध्यक्षपदाचा सत्तारूढ भाजप राजकीय वापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. जी-२० अध्यक्षपदाचे बोधचिन्ह हे भाजपचे निवडणूक चिन्ह आणि रंगसंगती भाजपचा झेंडा असल्याची टीका काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी केली आहे. भाजपने मात्र कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे आणि भारताच्या राष्ट्रध्वजातील भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा हे रंग वापरण्यात आले असल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा : मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा

अध्यक्षपदातून भारताच्या हाती काय लागणार?

जी-२० हा राष्ट्रगट प्रामुख्याने व्यापार, सहकार्य यासाठी तयार करण्यात आला आहे. याला आंतरराष्ट्रीय राजकारणात तसे फारसे महत्त्व नाही. त्यामुळे या गटाचे अध्यक्षपदही तसे म्हटले तर ‘प्रतीकात्मक’ स्वरूपाचे आहे. मात्र यानिमित्ताने देशातील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

amol.paranjpe@expressindia.com