Karachi Bakery Origins: भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील कराची बेकरीच्या एका शाखेची तोडफोड केल्याचा आरोप होत आहे. बेकरीच्या मालकांनी दुकानाचे नाव बदलावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असे तेलंगणा पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजता झालेल्या निदर्शनादरम्यान ही घटना घडली. ही घटना शमशाबाद येथील कराची बेकरीच्या शाखेत घडली. ही बेकरी पाकिस्तानी असल्याचा आरोपही करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर कराची बेकारीचे मूळ भारतात की पाकिस्तानात? काय आहे या नावामागचा इतिहास? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
कराची बेकरीची स्थापना आणि वादग्रस्त नाव
कराची बिस्किटांची गोडी अनेक भारतीयांच्या जिभेवर रेंगाळते. परंतु, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराची बेकारीच्या गोडीला आता काहीसा कडवटपणा आला आहे. हैदराबादमधील या सुप्रसिद्ध बिस्किट ब्रँडच्या नावावरून वाद निर्माण झाला असून अनेकांनी या बेकारीचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. कराची या पाकिस्तानमधील शहरावरून या बेकारीचे नाव असल्यामुळे ही मागणी करण्यात येत आहे. शिवाय या बेकारीचे मूळ पाकिस्तानात असल्याच्या अफवाही सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहेत. त्यामुळे या ब्रँडवर परिणाम झाला आहे. कराची बेकरीची कहाणी ही जवळपास भारताच्या स्वातंत्र्याइतकीच जुनी आहे. या बेकारीच्या मालकाने एक लहानशी बेकरी सुरु केली होती. परंतु, या लहानशा बेकारीचे नाव आज घराघरात ओळखलं जात आहे.
कराची बेकरीचा इतिहास
‘कराची बेकरी’ ही भारत-पाकिस्तान फाळणीची एक अप्रत्यक्ष देणगीच म्हणता येईल. या बेकरीची स्थापना १९५३ साली खनचंद रामनानी यांनी हैदराबादमध्ये केली होती. फाळणीदरम्यान, रामनानी कुटुंबाने पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून स्थलांतर केले आणि भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी केवळ काही खास पाककृती आणि आठवणींचा ठेवा बरोबर आणला होता. खनचंद रामनानी यांचा मूळ व्यवसाय कराचीमध्ये होता. भारतात आल्यानंतर, त्यांनी आपल्या जुन्या आठवणींच्या सन्मानार्थ, नव्याने सुरू केलेल्या बेकरीचं नाव ‘कराची बेकरी’ असं ठेवलं. १९४७ साली फाळणीच्या काळात, खनचंद रामनानी आपल्या चार मुलांसह पाकिस्तानमधील सिंध प्रांतातून भारतातील हैदराबाद येथे आले होते. सिंधमध्ये त्यांचा आधीचा बेकरी व्यवसाय होता. मात्र, कुटुंबाने भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि इथेच त्यांनी पुढे या बेकरी साम्राज्याची पायाभरणी केली.
प्रगतीचा प्रवास आणि आधुनिक रूप
प्रारंभी या बेकरीमध्ये इतर ठिकाणांहून आणलेले खाद्यपदार्थ विकले जात होते. परंतु, १९६० च्या दशकात त्यांनी स्वतःची फळांपासून तयार केलेली बिस्किटं आणि उस्मानिया बिस्किटं तयार करण्यास सुरुवात केली. ही बिस्किटं आजही लोकांच्या पसंतीस पडतात. कराची बेकरीची पहिली शाखा हैदराबादमधील मोअझम जाही मार्केट येथे सुरू झाली होती. पुढे, दुसरी शाखा २००७ साली बनजारा हिल्स या उच्चभ्रू भागात उघडण्यात आली.
भारतामधील मूळ आणि नागरिकत्त्वाचा वाद
सध्याच्या वादात, काही गटांनी बेकरीचं नाव बदलण्याची मागणी केली असली तरी, बेकरी भारतीय असल्याचे बेकारीच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. Karachi Bakery is 100% Indian म्हणजेच कराची बेकरी ही शंभर टक्के भारतीय ब्रँड आहे, अशी माहिती देणारी सोशल मीडिया पोस्टही करण्यात आली आहे. “WE ARE PROUDLY INDIAN, आमचं नाव आमच्या इतिहासाचा भाग आहे, आमच्या राष्ट्रीयत्वाचा नाही. आम्ही एक भारतीय ब्रँड आहोत आणि भारतासाठी प्रेमाने सेवा देत आहोत” अशी माहिती पोस्ट मधून देण्यात आली आहे.
कराची बेकरीचे मालक कोण?
खनचंद रामनानी यांनी १९५३ साली भारतात येऊन ही बेकरी सुरू केली. आज त्यांचे नातू आणि कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सदस्य हा व्यवसाय यशस्वीरित्या चालवत आहेत. कराची बेकरी आज दर्जेदार बेकरी प्रॉडक्ट्ससाठी एक प्रतिष्ठित नाव ठरले आहे. नुकत्याच सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, बेकरीचे व्यवस्थापक विजय रामनानी यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “आमच्या आजोबांनी फाळणीच्या वेळी भारतात येऊन ही बेकरी सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी कराचीतल्या त्यांच्या आठवणींमुळे हे नाव ठेवले. आता तब्बल ७३ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.” ते पुढे म्हणाले की, “आम्ही मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो की, या नावात बदल होऊ नये यासाठी मदत करावी. आमच्या ग्राहकांनी बेकरीच्या प्रत्येक शाखांवर तिरंगा लावलेला आहे. कृपया लक्षात घ्या, आम्ही भारतीय आहोत, पाकिस्तानी नाही.”
कराची बेकरी हे नाव जरी पाकिस्तानच्या शहरावरून घेतलं गेलं असलं, तरी हा ब्रँड पूर्णतः भारतीय आहे. फाळणीच्या जखमा आणि आठवणी यांच्या पार्श्वभूमीवर ही बेकरी भारतीय भूमीवर उभी राहिली आहे आणि आजही तितक्याच अभिमानाने टिकून आहे.