Operation Sindoor and the History of 1965 Indo-Pak war: जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेली घुसखोरी आणि आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने सीमारेषा ओलांडत लाहोरकडे झेप घेतली… ही कारवाई काही केवळ सैनिकी विजय नव्हता, तर पाकिस्तानच्या युद्धनीतिला जबरदस्त हादरा देणारी अशी ती घटना होती.

Operation Sindoor अंतर्गत गुरुवारी सकाळच्या कारवाईत भारताने पाकिस्तानात लाहोरजवळील हवाई हल्लाविरोधी यंत्रणा उद्ध्वस्त केली, असं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात ९ मे रोजी म्हटलं होतं. भारतीय लष्कराच्या या कारवाईमुळे पाकिस्तानच्या हवाई कारवाया मोठ्या प्रमाणावर थोपवून धरण्यास मदत झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारताने १९६५ साली लाहोरवर केलेल्या ऐतिहासिक हल्ल्याचा घेतलेला हा आढावा.

१९६५ साली ६ सप्टेंबर रोजी लाहोरवर झालेला हल्ला जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमणाचा प्रतिशोध होता. याच हल्ल्याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे. हा हल्ला होणार याची पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी पुसटशीही कल्पना नव्हती. भारत हा केवळ जम्मू आणि काश्मीरपुरताच सैनिकी कारवाई करेल अशी पाकिस्तानची अपेक्षा होती. परंतु, भारताने केलेल्या अनपेक्षित कारवाईमुळे पाकिस्तान हादरले. ६ सप्टेंबर रोजी पहाटे भारतीय लष्कराने तीन बाजूंनी लाहोरवर हल्ला चढवला. त्यानंतर पुढील दोन दिवसांनी म्हणजे ८ सप्टेंबर रोजी पठाणकोट- जम्मूच्या बाजूने पाकिस्तानच्या सियालकोट शहरावरही एकाच वेळी हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तान पुरते बिथरून गेले.

६ सप्टेंबर १९६५ रोजी नेमके काय घडले?

१९६५ साली ६ सप्टेंबर रोजी पहाटे भारतीय सैन्याच्या तुकड्यांनी पाकिस्तानातील लाहोर क्षेत्रात तीन दिशांनी एकाच वेळेस हल्ला चढवला. हे तीन आघाडीचे हल्ले वाघा-डोगराई, खालरा-बुर्की आणि खेमकरण-कसूर या मार्गांवर करण्यात आले होते. याचा अर्थ लाहोरला तीन बाजूंनी धोका निर्माण झाला होता. प्रसिद्ध वाघा सीमेजवळील संयुक्त तपासणी चौकी भारताने अचानक गोळ्या झाडून ताब्यात घेतली आणि त्यानंतर भारतीय लष्कराच्या तुकड्या लाहोरच्या दिशेने वेगात पुढे सरकल्या. आघाडीच्या भारतीय सैन्याच्या तुकड्या लाहोरच्या बाहेरील बटापूर, डोगराई आणि बुर्की भागात पोहोचल्या. आज ही गावे लाहोर शहराचा भाग आहे.

भारताने लाहोरवर हल्ला का केला?

पाकिस्तानने ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत १९६५ साली ऑगस्टपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये छुपे युद्ध सुरू केले होते. १ सप्टेंबर रोजी पाकिस्तानने जम्मूजवळील अखनूर भागात रणगाडे आणि हवाई दलाच्या सहाय्याने पारंपरिक लष्करी हल्ला केला. त्यांचा उद्देश अखनूर परिसर काबीज करणे आणि जम्मूकडे पुढे सरसावणे हा होता. या पाकिस्तानी आक्रमणाच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे हल्ला चढवला. ५ आणि ६ सप्टेंबरच्या दरम्यानच्या रात्री भारताने अनेक ठिकाणी सीमा ओलांडली आणि लाहोर क्षेत्रावर अचानक हल्ला केला.

लाहोरवर हल्ला करणे महत्त्वाचे का होते?

त्यावेळी पश्चिमी लष्करी कमांडर असलेले लेफ्टनंट जनरल हरबक्ष सिंग यांच्या मते या हल्ल्याच्या रणनीतिमागील उद्देश पाकिस्तानला या भागात सैन्य तैनात करण्यास भाग पाडणे आणि त्यांच्या सैन्याला अखनूरमध्ये मदत करण्यापासून रोखणे हा होता. पंजाबमधील पाकिस्तानी क्षेत्र मोठ्या प्रमाणात काबीज करून भविष्यातील चर्चेत भारताला वरचष्मा मिळावा, यासाठी अशी योजना भारताने आखली होती. लाहोरजवळील इच्छोगिल कालवा ताब्यात घेण्याचेही भारताचे उद्दिष्ट होते.

भारतीय सैन्याचा प्रारंभीचा यशस्वी हल्ला

ग्रँड ट्रंक रोडवरून भारतीय लष्कराच्या १५ व्या पायदळ विभागाने पाकिस्तानच्या वाघा सीमेजवळील सुरक्षा दलांना सहज पराभूत केले. पायदळाच्या काही तुकड्या बटापूरपर्यंत पोहोचल्या.

प्रारंभीच्या यशानंतर पुढे प्रगती का झाली नाही?

१५ वे पायदळ विभाग आणि ४ माउंटन डिव्हिजनने केलेल्या प्रारंभीच्या यशानंतर काही भागांमध्ये गती टिकवून ठेवता आली नाही. सैन्यदलातील वरिष्ठ नेतृत्वाच्या दुर्बलतेमुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले. ही संधी साधून पाकिस्तानने खेमकरण भागात प्रतिहल्ला केला आणि सुरुवातीलाच काही क्षेत्र परत मिळवली. परंतु नंतरच्या असाल उत्तरच्या ऐतिहासिक लढाईत भारतीय सैन्याने पाकिस्तानचे पॅटन रणगाडे उद्ध्वस्त केले.

या धाडसी मोहिमेचा परिणाम काय?

पाकिस्तान सरकार आणि लष्कराला भारत पंजाबमध्येही युद्धात आघाडी घेईल याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे ६ सप्टेंबरचा हल्ला पूर्णपणे अनपेक्षित होता. पाकिस्तानला लाहोर भागात अतिरिक्त सैन्य पाठवावे लागले आणि पाकिस्तानी हवाई दलालाही अखनूर ऐवजी लाहोरकडे लक्ष केंद्रित करावे लागले. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि इतिहासकार कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मते, लाहोर काबीज करण्याचा भारतीय लष्कराचा उद्देश नव्हता. कारण, शहरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्याची गरज भासली असती. परंतु रावी नदीवरील पूल उद्ध्वस्त करणे आणि लाहोर-वझिराबाद महामार्गावर नियंत्रण मिळवणे ही योजना निश्चितच होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८ मे रोजी भारतीय सैन्याने लाहोर येथील हवाई हल्लाविरोधी यंत्रणा जोरदार हल्ल्यात उद्ध्वस्त केल्याने १९६५ च्या युद्धातील लाहोरशी संबंधित आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.