What is the importance of Dwarka? भारताला लाखो वर्षांचा इतिहास असला तरी… ही मोहीम केवळ पुरातत्त्वीय मोहीम नाही. ही मोहीम म्हणजे हजारो वर्षांपूर्वी समुद्रात गडप झालेला एक अद्भुत अध्याय उलगडण्याचा प्रयत्न आहे. कधी काळी श्रीकृष्णाचं निवासस्थान असलेली द्वारका नगरी आज मात्र समुद्राच्या गर्भात खोल कुठेतरी तिच्या अस्तित्त्वाचा खुणा जपत आहे. याच अस्तित्त्वाच्या खुणा भूतलावर आणण्याचं काम भारतीय पुरातत्त्व खात्याची अंडरवॉटर विंग करत आहे. भूतकाळातील गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या पौराणिक नगरीच्या अवशेषांचा मागोवा घेण्यासाठी भारतीय पुरातत्त्व खातं या नव्या मोहिमेत उतरलं आहे. पाण्याखाली हरवलेली ही नगरी खरंच ऐतिहासिक द्वारका आहे का? याचं प्रश्नाचा शोध घेणं त्यांचा मुख्य उद्देश आहे. यावर्षी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) गुजरातच्या द्वारका किनाऱ्यावरील समुद्रात दोन स्वतंत्र संशोधन मोहिमा पूर्ण केल्या आहेत. तर उर्वरित वर्षात या स्थळाच्या ऐतिहासिकतेवर अधिक ठोस पुरावे मिळवण्यासाठी आणखी एक तपशीलवार संशोधन मोहीम राबवली जाणार आहे.

नवीन संशोधन नेमके काय?

या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या या संशोधनात ASI च्या अंडरवॉटर आर्किओलॉजी विंगने द्वारका आणि बेट द्वारका येथे किनारपट्टीवरील आणि समुद्राखालील असे दोन टप्प्यात सर्वेक्षण आणि संशोधन केलं. द्वारका हे भारताच्या मुख्य भूमीच्या पश्चिम टोकावर आहे. याच भागात कच्छच्या आखातातून अरबी समुद्र सुरू होतो. बेट द्वारकेला शंखोधर असंही म्हणतात. हे द्वारकेपासून सुमारे २५ किमी नैऋत्य दिशेला असलेलं एक छोटं बेट आहे. हे बेट ओखा शहराजवळ आहे. २०२४ साली फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्राच्या तळाशी जाऊन पूजा केली होती. या अनुभवाचे वर्णन त्यांनी दैवी अनुभव असे केले होते. त्यावेळी पंतप्रधानांनी ओखा आणि बेट द्वारका जोडणाऱ्या चार मार्गीय ‘सुदर्शन सेतू’ पुलाचं उद्घाटनही केलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला ASI च्या पाच सदस्यीय टीमने गोमती खाडीच्या दक्षिण भागात २००७ साली तपासलेली ठिकाणं पुन्हा पाहण्यासाठी आणि त्यांची सध्याची स्थिती तपासण्यासाठी काम सुरू केलं आहे. यानंतर मार्च महिन्यात अधिक मोठ्या पाणबुडी तज्ज्ञांच्या टीमने समुद्रात उतरून संशोधन, दस्तऐवजीकरण, प्रशिक्षण आणि समुद्राखालील पुरातत्त्व अवशेषांचा अभ्यास केला.

द्वारकेची आख्यायिका

महाभारतात द्वारकेचा उल्लेख आहे. श्रीकृष्णाने मथुरेमध्ये कंसाचा वध केल्यानंतर द्वारकेची निर्मिती केली होती. प्रचलित आख्यायिकेनुसार श्रीकृष्णाने समुद्रातून १२ योजन (सुमारे ९६ चौरस किलोमीटर) जमीन परत मिळवून द्वारका शहर उभारले होते. द्वारकेचा उल्लेख प्राचीन साहित्यामध्ये वारंवार येतो आणि ती ऐतिहासिक, पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. त्यामुळे अनेक वर्षे इतिहासकार आणि पुरातत्त्ववेत्ते तिचं अस्तित्त्व शोधण्यासाठी संशोधन करत आहेत,” असं यावर्षीच्या मोहिमेचे प्रमुख आणि ASI चे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांनी सांगितलं. परंतु, ऐतिहासिक द्वारकेचं स्थान आणि कालावधी अजूनही निश्चित नाही. विविध साहित्यात दिलेले उल्लेख एकमेकांशी विसंगत आहेत.

यापूर्वीचे संशोधन

१९६३ साली सर्वप्रथम संशोधन किनारीभागात सुरू झालं. या संशोधनात काही पुरातत्त्वीय अवशेष सापडले, असं गुजरात सरकारच्या संकेतस्थळावर नमूद केलं आहे. मात्र, द्वारकाधीश मंदिराच्या आजूबाजूला फारसं मोकळं क्षेत्र नसल्यामुळे पुरातत्त्वीय उत्खनन मर्यादित स्वरूपाचं होतं. समुद्राखालील सर्वेक्षणात वसाहत, मोठं दगडी बंदर आणि तीन छिद्र असलेले त्रिकोणी अँकर सापडले. या वसाहतींचं स्वरूप आतील व बाह्य भिंती आणि तटबंदी असं होतं. या अवशेषांच्या विश्लेषणावरून द्वारका हे ८ व्या ते १८ व्या शतकांदरम्यान मध्ययुगीन भारतातील एक समृद्ध बंदर होतं, असे अनुमान काढण्यात आलं. २००७ साली या क्षेत्रात पुन्हा एकदा कमी भरतीच्या वेळी किनारी भागात आणि समुद्राखाली संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा मूळ उद्देश साहित्यिक पुराव्यांवर आधारित प्राचीनतेची पडताळणी करणे हा होता. समुद्राखाली सापडलेले अवशेष अभ्यासले आणि नोंदवले गेले. द्वारकाधीश मंदिराजवळच्या भागातही उत्खनन झालं. या उत्खननात मातीची खेळणी, मणी, बांगड्यांचे तुकडे, तांब्याच्या अंगठ्या, लोहाचे तुकडे आणि मातीची भांडी मिळाली.

पुढे काय?

यावर्षीच्या सर्वेक्षणात सापडलेल्या वस्तूंची अचूक प्राचीनता जाणून घेण्यासाठी गाळाचे नमुने, समुद्रातील व भूवैज्ञानिक साच्यांचं वैज्ञानिक विश्लेषण गरजेचं आहे, असं एका वरिष्ठ ASI अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं. अत्याधुनिक वैज्ञानिक पद्धत आणि वस्तूंचं अचूक कालमापन यामुळे द्वारकेच्या ऐतिहासिक संदर्भाविषयी अधिक स्पष्टता येईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्र आणि ओडिशाच्या किनाऱ्यांवरही शोध मोहीमा

ASI च्या या विंगला गेल्या काही काळात अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे मोहीम थांबवावी लागली होती. याआधी तामिळनाडूमधील पूंपुहारजवळ १९८१ ते २००० या कालखंडादरम्यान २००० वर्षे प्राचीन कावेरीपट्टणम बंदर शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. आता ASI ही विंग पूर्णपणे कार्यक्षम होण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही वर्षांत तामिळनाडूच्या कावेरी डेल्टामधील अनेक स्थळं तसेच महाराष्ट्र आणि ओडिशाच्या किनाऱ्यांवरही शोध मोहीमा राबवल्या जाणार आहेत.