राखी चव्हाण

Cheetah Kuno Park Madhya Pradesh दक्षिण आफ्रिकेतून भारतात सहा महिन्यांत २० चित्ते (सप्टेंबर २००२ मध्ये आठ आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये बारा) आणले गेलेत. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांसाठी पुरेशी शिकार नाही, असा दावा करणाऱ्या चित्ता स्थलांतरण प्रकल्पातील एका प्रमुख वन्यजीव शास्त्रज्ञांना अलीकडेच या प्रकल्पातून दूर सारण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारे काही चित्ते मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्पात ठेवण्याबाबतही केंद्राला विनवणी करणाऱ्या राजस्थान सरकारने  चित्ता प्रकरणात राजकीय हिताला प्राधान्य देण्यात आले, असेही म्हटले आहे. यातील एका चित्त्याचा नुकताच मृत्यू झाल्यामुळे या म्हणण्याला बळ मिळाले आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
south east central railway recruitment 2024 Job opportunities in south east central railway
नोकरीची संधी : ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’मधील संधी
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?

कुनोतील चित्त्यांना शिकार पुरेशी आहे का?

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात प्रति चौरस किलोमीटर २० चितळ आहेत. २०१४ मध्ये हीच संख्या ६० इतकी होती. म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २०२३ मध्ये चितळांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये २० चितळ असणे ही १५ चित्त्यांसाठी पुरेशी शिकार आहे, पण २० चित्त्यांसाठी ते पुरेसे नाही. त्यामुळे काही चित्ते राजस्थानमध्ये स्थलांतरित करणे योग्य होते. दक्षिण आफ्रिकेत चित्ते इम्पाला, चिंकारा, काळवीट अशा प्राण्यांची शिकार करतात. भारतात इम्पाला नाही, पण सांबर, चिंकारा, काळवीट आहे. मात्र, कुनोत ही संख्या पुरेशी नाही.

या प्रकल्पात राजकारण आड आले का?

भारतात चित्ता परत आणण्यावर शिक्कामोर्तब झाले तेव्हा अनेक राज्यांतील जंगलांचा विचार करण्यात आला. त्या जंगलांची तज्ज्ञांनी पाहणी केली. त्यानंतर मध्य प्रदेशसोबतच राजस्थानवरदेखील शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरुवातीला राजस्थान सरकार यासाठी फारसे इच्छुक नव्हते, पण २०२२ मध्ये त्यांनी राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला पत्र लिहून चित्ते स्वीकारण्याची तयारी दर्शवली. राजस्थानमधील मुकुंद्रा व्याघ्र प्रकल्प तुलनेने लहान असले तरीही चित्त्यांसाठी ते परिपूर्ण आहे. मात्र, मध्य प्रदेशात भाजपचे सरकार असल्याने आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने राजस्थानला डावलून मध्य प्रदेशला प्राधान्य देण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले.

कुनो अभयारण्य पुरेसे नाही का?

कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी पुरेशी शिकार नसणे हे चिंताजनक आहे. चित्ता कृती आराखडय़ात २०२१ मध्ये वैज्ञानिक नमुना प्रक्रियेच्या आधारावर एक अंदाज वर्तवण्यात आला होता. या अंदाजानुसार कुनोत प्रति चौरस किलोमीटर एकूण ३८ चितळ होते. या कृती आराखडय़ात असेही नमूद करण्यात आले होते की २१ चित्त्यांसाठी शिकारीची ही पातळी पुरेशी आहे. मात्र, आता ही संख्या कमी झाली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पूर्वी कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या ७४८ चौरस किलोमीटरचा परिसर आणि सुमारे चार हजार चौरस किलोमीटरचा मोठा परिसर एकत्रितपणे ३६ ते ४० प्राण्यांसाठी पुरेसा असल्याचे नमूद केले होते.

चित्त्यांना अधिवास कमी पडतो का?

वाघ आणि सिंहांच्या तुलनेत चित्त्यांना धावण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी विस्तीर्ण प्रदेशाची आवश्यकता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेची तुलना केल्यास दक्षिण आफ्रिकेपेक्षा भारतात प्रति चौरस किलोमीटरमध्ये अधिक प्राणी राहू शकतात. मात्र, चित्त्याला सिंह आणि वाघांपेक्षा अधिक क्षेत्र लागते. ते त्यांची शिकार अधिक काळ पकडून ठेवू शकत नाही. त्यामुळे कुनोतील त्यांच्या शिकारीची घनता पाहता चित्ते या अधिवासाशी जुळवून घेण्याची शक्यता फार कमी आहे. त्यांच्यासाठी आदर्श अधिवास करायचा तर पाच ते दहा हजार चौरस किलोमीटरची आवश्यकता आहे. मात्र, कुनो राष्ट्रीय उद्यान हे केवळ ७४८ चौरस किलोमीटर आहे.

यशस्वितेसाठी काय करायला हवे?

चित्ता प्रकल्पाचे खरे यश हे त्यांना मिळणारी पुरेशी शिकार आणि चित्ते त्या ठिकाणी स्थिरावण्यावर असेल. चित्ता प्रकल्पामुळे भारताच्या खुल्या जंगलात आणि गवताळ प्रदेशातील परिसंस्थांना मदत होऊ शकते. परिणामी गवताळ प्रदेशात राहणाऱ्या माळढोक, तणमोर, लांडगा यांसारख्या इतर प्रजातींचा अधिवासदेखील संरक्षित होऊ शकतो. मध्य प्रदेशमध्येच गंगासागर आणि नौरादेही अभयारण्यात चित्त्यांना स्थलांतरित करावयाचे झाल्यास तिथले अधिवास चित्त्यांसाठी अनुकूल करावे लागतील. तिथल्या माळरानांचे संवर्धन करावे लागेल. सुरुवातीला चित्त्यांचे भक्ष्य असलेले प्राणीही सोडावे लागतील. हे करण्यासाठी बराच कालावधी लागेल आणि त्यासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्चदेखील करावा लागेल.