भारतीय लग्न म्हणजे ‘बिग फॅट वेडिंग’ असे समीकरणच हल्ली झाले आहे. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करणे हे ‘बिग फॅट वेडिंग’चे प्रमुख लक्षण मानले जाते. या लग्नाच्या हंगामात देशभरात ३५ लाख विवाहसोहळे होणार असल्याचा अंदाज या विषयाशी संबंधित तज्ज्ञ सर्वक्षण संस्थांनी व्यक्त केला आहे. लग्नात २०% खर्च वधू- वरांवर तर उर्वरित ८०% खर्च इतर गोष्टींवर केला जातो. नवीन ट्रेण्डनुसार ‘डेस्टिनेशन वेडिंग’ला अधिक पसंती दिली जाते. ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ हा एक भव्य उत्सव असतो. टीव्हीवरील मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या भव्य दिव्य समारंभाचे जिवंत रूपच ते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. या सोहळ्याचा उद्देश केवळ विवाहगाठ बांधणे एवढाच नसतो, तर या सोहळ्याच्या माध्यमातून आलिशान व्हेन्यूपासून ते मोठ्या मेजवान्यांपर्यंत संपत्तीचे झगमगाटी प्रदर्शन हा मूळ हेतू असतो. ‘बिग फॅट इंडियन वेडींग’मध्ये लग्नाच्या ठिकाणी हत्ती आणि ड्रोन एकाच वेळी दिसतात. म्हणजेच भारतीय पारंपरिक पद्धत आणि आधुनिकतेचा एकत्र अविष्कार पाहायला मिळतो. असे असले तरी विवाह हा भारतीय संस्कृतीत पवित्र विधी मानण्यात आल्याने लग्नाच्या भव्य दिव्यतेला तिथेही प्राधान्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर भारतीयांना ग्लॅमरस भव्य विवाहसोहळ्यांविषयी आकर्षण का, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे.
अधिक वाचा: राजपूत समाजातील बहुपत्नीत्त्व विवाह मध्ययुगीन कालखंडात का महत्त्वाचे ठरले?
यंदा भारतात किती विवाह सोहळे आणि खर्च अपेक्षित?
वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबरीनेच, देशभरातील व्यापारी वर्गही लग्नाच्या हंगामासाठी सज्ज असल्याचे दिसतं आहे. सर्वसाधारण भारतीय ‘विवाह कालखंड’ दोन भागात विभागला जातो. पहिला टप्पा देवोत्थान एकादशीपासून सुरू होऊन १५ डिसेंबरपर्यंत संपतो. तर लग्नसराईचा पुढचा टप्पा जानेवारीच्या मध्यापासून सुरू होतो तो जुलैपर्यंत सुरु राहतो.
सीएआयटी रिसर्च अॅण्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, या कालावधीत देशभरात सुमारे ३५ लाख विवाहसोहळे पार पडणे अपेक्षित आहे आणि लग्नाच्या खरेदी-विक्री आणि विविध सेवा यात सुमारे ४.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल. सीएआयटी रिसर्च अॅण्ड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटी ही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ची संशोधन शाखा आहे, त्यांनी २० वेगवेगळ्या शहरांतील व्यापारी आणि सेवाप्रदात्यांचे सर्वेक्षण करून हे अनुमान मांडले आहे. “अंदाजानुसार, या वर्षी ३५ लाख विवाहसोहळे होणार आहेत आणि प्रत्येक लग्नासाठी सरासरी १२ लाख रुपये खर्च होणार आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ३२ लाख विवाह झाले. त्यामुळे, या वर्षी लग्नाचा हंगाम आणखी मोठा असणार आहे,” असे मत अमन कुमार (सह-संस्थापक आणि सीटीओ, विवाहहीट, वेड टेक कंपनी) यांनी ‘बिजनेस इनसाईडर’कडे नमूद केले. सध्या देशभरात एकूणच आर्थिक अनिश्चिततेची टांगती तलवार आहे, तसेच नोकऱ्यांमध्येही मंदी आहे. परंतु त्याचा या सोहळ्यांवर फारसा फरक पडलेला दिसत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
लग्नावर किती खर्च केला जातो?
इतर कोणत्याही गोष्टीप्रमाणे लग्नाचे बजेटही बदलते. सीएआयटीच्या सर्वेनुसार, या लग्नाच्या हंगामात, सुमारे ६ लाख विवाहांपैकी एका विवाहासाठी सुमारे ३ लाख इतका खर्च अपेक्षित आहे, तर सुमारे १० लाख लग्नांमध्ये प्रत्येकी एका विवाहासाठी सुमारे ६ लाख रुपये खर्च येईल, तर १२ लाख विवाहांपैकी प्रत्येक लग्नासाठी १० लाख रुपये अपेक्षित आहे. शिवाय, असेही विवाह आहेत ज्यात ६ लाख विवाहांपैकी प्रत्येक लग्नासाठी २५ लाख रुपये खर्च येईल, ५० हजार विवाहांपैकी प्रत्येक लग्नासाठी ५० लाख रुपये खर्च येईल आणि इतर ५० हजार विवाहांपैकी प्रत्येकी एका लग्नासाठी १ कोटी किंवा त्याहून अधिक पैसे खर्च केले जातील.
‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ मागील अर्थशास्त्र
येथे एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे, विवाहाशी अनेक उद्योग, व्यवसाय जोडले गेले आहेत. सीएआयटीने नमूद केल्याप्रमाणे, लग्नाच्या मोसमात घरांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी यापासून दागिने, पारंपारिक कपडे जसे की साड्या आणि लेहेंगा-चोली, फर्निचर, तयार कपडे, शूज, शुभेच्छापत्रे, सुका मेवा, मिठाई, फळफळावर, पूजेच्या वस्तू, किराणा माल, अन्नधान्य यासारख्या वस्तूंची विस्तृत श्रेणी, सजावटीच्या वस्तू, गृहसजावट, विद्युत उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि विविध भेटवस्तूंना मागणी असते. देशभरात बँक्वेट हॉल, हॉटेल्स, खुली लॉन्स, कम्युनिटी सेंटर्स, सार्वजनिक उद्याने आणि फार्महाऊससह विवाहसोहळ्यांची ठिकाणे तयार केली जातात.
प्रत्येक लग्नासाठी ॲक्सेसरीज खरेदी करण्याव्यतिरिक्त, विविध सेवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामध्ये मंडप सजावट, फुलांची सजावट, क्रॉकरी, खानपान सेवा, प्रवास व्यवस्था, वाहतूक सेवा, व्यावसायिक स्वागत गट, भाजी विक्रेते, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर, शहनाई (वाजंत्री), ऑर्केस्ट्रा, डीजे, मिरवणुकीत घोडे, वॅगन, रोषणाई, संगीत आणि बरेच काही समाविष्ट असते. ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ हा देखील एक भरभराटीचा व्यवसाय म्हणून उदयास आला आहे, लग्नस्थळांच्या बुकिंगपासून ते प्रत्यक्ष सोहळा घडवून आणण्यापर्यंतच्या सर्व व्यवस्था इथे पार पाडल्या जातात.
चिंतेची बाब
इतिहासातही ‘बिग फॅट वेडिंग’ची अनेक उदाहरणे सापडतात. पूर्वी राजे-महाराजे अशा मोठ्या विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून राज्यविस्तार, शेजारील राज्यांशी सलोखा वाढविण्याचे काम करत असतं. प्राचीन भारतात राजघराण्यात एकापेक्षा अधिक होणारे विवाह हे राजकीय खेळीचाच भाग असत. मध्ययुगीन कालखंडात राजस्थान मधील सिसोदिया वंशाचे कर्ता-धर्ता असलेल्या बाप्पा रावल यांचे १४० विवाह झाल्याची आख्ययिका आहे. यामागील मुख्य हेतू राज्यविस्तार होता, हे उघडच आहे. किंबहुना आजच्या काळातही व्यापारी वर्गात याच स्वरूपाच्या ‘बिग फॅट वेडींग’ची क्रेझ आहे. यामागील हेतू हा व्यापारी संबंध वाढवणे व त्यातून व्यापार- उद्योगाचा विस्तार करणे हाच होय. राज्यकर्ते, व्यापारी यांचा या सारख्या मोठ्या सोहळ्यांमागील हेतू कितीही व्यापक असला तरी त्यांचे अनुसरण सामान्य जनतेतही होताना दिसते, किंबहुना त्यासाठीच काढली जाणारी कर्जे ही चिंतेची बाब आल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.