अमेरिकेच्या ‘एनोला गे’ बी-२९ बॉम्बर विमानाने कर्नल पॉल टिबेट्स यांच्या नेतृत्वाखाली ६ ऑगस्ट १९४५ रोजी प्रशांत महासागरातील तिनियन बेटावरील धावपट्टीवरून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले. विमानाचे एनोला गे हे नाव टिबेट्स यांच्या आईच्या नावावरून घेतले होते. त्याबरोबर आणखी दोन विमाने वैज्ञानिक निरीक्षणासाठी पाठवली होती. उड्डाणानंतर तासाभराने टिबेट्स यांनी विमानाच्या ११ कर्मचाऱ्यांना सांगितले की त्यांच्या विमानात ‘लिटल बॉय’ नावाचा अणुबॉम्ब आहे आणि त्याची सूत्रे ‘मॅनहटन’ प्रकल्पाचे शस्त्रास्त्र प्रमुख आणि विमानाचे कमांडर कॅप्टन विल्यम पार्सन्स यांच्याकडे दिली. सकाळी सव्वासात वाजता जपानच्या रडारनी ही तीन विमाने हेरली आणि धोक्याचा इशारा देण्यात आला. मात्र ८ वाजेपर्यंत ही तीनच विमाने दिसल्याने ती टेहळणीसाठी आली असावीत असे समजून इशारा मागे घेण्यात आला. ८ वाजून ९ मिनिटांनी एनोला गे हिरोशिमाच्या आसमंतात २५,००० फूट उंचीवर होते. हवामान अनुकूल असून बॉम्ब टाकण्यासाठीचा अखेरचा संदेश मिळाला. सकाळी ८ वाजून १६ मिनिटांनी हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकण्यात आला. जमिनीपासून १९०० फूट अंतरावर हवेत ‘लिटल बॉय’चा १५ किलोटन क्षमतेने (१५,००० टन टीएनटी स्फोटकांच्या ताकदीएवढा) स्फोट झाला. स्फोटाने सूर्यापेक्षा अधिक तापमान तयार झाले. स्फोटाच्या केंद्रापासून ४००० फूट त्रिज्येतील घरांची छपरे वितळून गेली. शहरातील ९०,००० पैकी ६०,००० इमारती पूर्ण नष्ट झाल्या. ६००० फूट त्रिज्येतील इमारती पूर्ण जळून गेल्या. १,१८,६६१ नागरिक मरण पावले आणि ७९,१३० नागरिक जखमी झाले. जखमींवर उपचारांसाठी रुग्णालये आणि डॉक्टर उरलेले नव्हते. शहरातील ९० टक्के डॉक्टर आणि परिचारिकांचा मृत्यू झाला होता आणि ५५ पैकी केवळ ३ रुग्णालये बचावली होती. किरणोत्सर्गामुळे १९५० पर्यंत २ लाख जणांचा मृत्यू झाला, तर पुढील तीन दशकांत (१९५० ते १९८०) कर्करोगाने ९७,००० जणांचा जीव गेला. मेजर चार्ल्स स्वीनी यांच्या नेतृत्वाखालील ‘बॉक्स कार’ नावाच्या बी-२९ विमानातून ९ ऑगस्ट १९४५ रोजी सकाळी ११ वाजून २ मिनिटांनी नागासाकी शहरावर ‘फॅट मॅन’ नावाचा अणुबॉम्ब टाकण्यात आला. शहरातील मात्सुयामा -माची येथील टेनिस कोर्टावर हवेत १६६० फूट उंचीवर त्याचा २१ किलोटन क्षमतेने स्फोट झाला. शहराचा ४.५५ चौरस मैलांचा भाग भुईसपाट झाला. ११,५७४ घरे जळाली आणि २,६५२ घरे पूर्ण नष्ट झाली. एकूण ७३,८८४ नागरिक मरण पावले आणि ७४,९०९ जण जखमी झाले. किरणोत्सर्ग आणि कर्करोगाने अनेक वर्षे माणसे मरत राहिली. अखेर १० ऑगस्ट १९४५ रोजी जपानने शरणागती स्वीकारली आणि दुसरे महायुद्ध संपले. जगाने अणुयुगात प्रवेश केला होता. सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com