आयपीएलचा अकरावा हंगाम रंगात आलेला असताना, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांना चांगलाच धक्का बसला आहे. कारण या तिन्ही संघातून खेळणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूंनी स्पर्धा मध्यावरच सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. २४ मे पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचे ४ खेळाडू आयपीएल मध्यावरच सोडून मायदेशी परतणार आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018 : कर्णधार म्हणून विल्यमसन आणि धोनीची शैली सारखीच – सुनील गावसकर

ख्रिस वोक्स, मोईन अली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), मार्क वुड (चेन्नई सुपरकिंग्ज), बेन स्टोक्स (राजस्थान रॉयल्स) हे खेळाडू महत्वाच्या टप्प्यावर आयपीएलचे सामने खेळताना दिसणार नाहीयेत. कसोटी मालिका सुरु होण्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना मायदेशी परत बोलावणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलचा प्रवास मध्यावरच संपणार आहे.

अकराव्या हंगामासाठी पार पडलेल्या लिलावात राजस्थान रॉयल्स संघाने बेन स्टोक्सवर १२.५० कोटी रुपयांची बोली लावली होती. बेन स्टोक्स या बोलीमुळे अकराव्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये स्टोक्सला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. मार्क वुड आणि ख्रिस वोक्स यांना अनुक्रमे चेन्नई आणि बंगळुरु संघात स्थान देण्यात आलं होतं, मात्र मैदानात आपला प्रभाव पाडू न शकल्यामुळे दोन्ही खेळाडूंनी संघातलं आपलं स्थान गमावलं.

चेन्नईच्या संघाने यंदा सर्वोत्तम चार संघाच्या यादीत आपलं स्थान बळकट केल्याने, त्यांना मार्क वुडची अनुपस्थिती फारशी जाणवणार नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आल्यामुळे मोईन अली आणि ख्रिस वोक्सच्या जाण्याचा बंगळुरुच्या संघावर फारसा परिणाम होणार नाही, मात्र कामगिरीत सातत्य न राखू शकलेल्या राजस्थान रॉयल्सला आपल्या आगामी सामन्यांमध्ये बेन स्टोक्सची अनुपस्थिती चांगलीच जाणवू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये हे संघ कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2018: फलंदाजीसाठी वेगळा सराव करत नाही – हार्दिक पांड्या