आयपीएलचा पहिलाच सामना खेळणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने बंगळुरुवर ४ गडी राखून मात केली. ७ चेंडू शिल्लक ठेवत कोलकात्याच्या संघाने बंगळुरुने दिलेलं आव्हान पार केलं. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना विराट कोहलीने, फलंदाजीत आपला संघ अंदाजे १५ ते २० धावा करण्यात कमी पडल्याचं मान्य केलं.

अवश्य वाचा – IPL 2018 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामना गमावला, मात्र मॅक्युलमच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

“माझ्यामते आम्ही आणखी १५-२० धावा करण्यात कमी पडलो. फलंदाजीदरम्यान मी देखील अनेक चेंडूवर धावा काढण्याच्या संधी गमावल्या. मी आणि एबी एकाच षटकात माघारी परतण तिकडेच आमच्या फलंदाजीची लय बिघडली. यानंतर सुनील नरीनने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळे आम्ही बॅकफूटलला ढकलले गेलो.” सामना संपल्यानंतर आपल्या संघाच्या कामगिरीबद्दल विराटने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – IPL 2018 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सामना गमावला, मात्र मॅक्युलमच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद

जर पहिल्याच षटकात तुम्ही १३ धावा देणार असाल तर इतर गोलंदाजांनाही सामन्यात पुनरागमन करणं कठीण जातं. इडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना गोलंदाजी करणं जिकरीचं काम होतं. मात्र आमच्या गोलंदाजांनी चांगला प्रयत्न केला असं म्हणत विराटने आपल्या गोलंदाजांचंही कौतुक केलं. दुसरीकडे कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकनेही आपल्या संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं. सुनील नरीनच्या फलंदाजीमुळे आम्हाला विजय मिळवणं शक्य झाल्याचं म्हणत दिनेश कार्तिकने प्रेक्षकांचेही आभार मानले. १९ चेंडूत ५० धावांची खेळी करणाऱ्या नरीनला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.