आयपीएलच्या १३ व्या हंगामाचं बिगुल वाजलं आहे. या हंगामातील पहिल्याच सामन्या धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघानं रोहितच्या मुंबई इंडियन्सला पाच विकेटने पराभवाचा धक्का दिला. या पराभवामुळे आयपीएलच्या हंगामाची मुंबईची सुरुवात पुन्हा एकदा निराशाजनक झाली आहे. पण पहिल्या सामन्यात पराभव होण्याची मुंबईची ही काही पहिली वेळ नाही. आयपीएलमधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत होण्याची मुंबईची ही सलग आठवी वेळ आहे. २०१२ साली झालेल्या आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईनं विजय मिळवला होता. त्यानंतर आतापर्यंत मुंबईला आपल्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आलेला नाही.

आयपीएलमध्ये सलग आठ वेळा आपल्या सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम मुंबईच्या संघानं आपल्या नावावर नोंदवला आहे. २०१८ मध्ये आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा मध्ये चेन्नईकडून पराभव झाला होता. २०१९ मध्ये दिल्ली तर २०१३ मधे आरसीबीकडून पराभव स्वीकारावा लागला होता. २०१६ आणि २०१७ मधील हंगामात आपल्या सलामीच्या सामन्यात मुंबईला पुणे संघानं पराभवाचा धक्का दिला होता. २०१४ आणि २०१५ च्या हंगामात आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईला कोलकाता संघाने हरवलं होतं.

आयपीएलमधील आपल्या पहिल्या सामन्यात मुंबईला आतापर्यंत फक्त चार वेळा विजय मिळवता आला आहे तर ९ वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. ४ वेळा चषकावर नाव कोरणाऱ्या मुंबईच्या संघाची आयपीएलमधील सुरुवात खराब असल्याचा आतापर्यंतचा विक्रम आहे. यंदाही पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

आयपीएलच्या आतापर्यंतच्या १३ हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यातील मुंबईची कामगिरी –

२०२० – चेन्नई संघानं पाच विकेटने मुंबईचा पराभव केला.
२०१९ – दिल्ली संघानं ३७ धावांनी मुंबईवर विजय मिळवला.
२०१८ – एका विकेटने चेन्नईने मुंबईचा पराभव केला.
२०१७ – पुणे संघाने सात बळी मुंबईचा पराभव केला.
२०१६ – मुंबईचा ९ विकेटने पुण्याने पराभव केला होता.
२०१५ – कोलकाता संघाने सात बळीने मुंबईचा पराभव केला.
२०१४ – मुंबई संघाचा कोलकाता संघाने ४१ धावांनी पराभव केला.
२०१३ – आरसीबीने दोन धावांनी मुंबईवर विजय मिळवला.
२०१२ – मुंबईचा चेन्नईवर ८ विकेटने विजय
२०११ – मुंबईचा दिल्लीवर ८ विकेटने विजय
२०१० – मुंबईचा राजस्थानवर चार धावांनी विजय
२००९ – मुंबईचा चेन्नईवर १९ धावांनी विजय
२००८ – आरसीबीचा मुंबईवर पाच विकेटने विजय