IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला उद्ध्वस्त करून टाकले. लोकेश राहुलच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर पंजाबने २० षटकात २०६ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावांतच गारद झाला. त्यामुळे पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा ठोकणारा लोकेश राहुल सामनावीर ठरला. विराट कोहलीने राहुलचा ८३ आणि ८९ या धावसंख्येवर असताना दोन वेळा सीमारेषेजवळ झेल सोडला. त्यानंतर राहुलने तुफान फटकेबाजी करत पुढील १० चेंडूत ४३ धावा कुटल्या. या साऱ्या प्रकाराबद्दल बोलताना विराट कोहली म्हणाला, "पहिल्या १५ षटकांच्या खेळापर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण त्यानंतर जे काही झालं त्यामुळे आम्ही पराभूत झालो. सर्वांसमोर उभं राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल. माझ्या चुकीमुळे आमचं आव्हान ३५ ते ४० धावांनी वाढलं. नाहीतर आम्ही पंजाबला १८० पर्यंत रोखू शकलो असतो आणि मग आमच्या फलंदाजीच्या वेळी पहिल्या चेंडूपासूनच आमच्यावर दडपण वाढलं नसतं." "क्रिकेटच्या कारकिर्दीत असे काही दुर्दैवी दिवस येतात. त्या दिवशी आपली चूक मान्य करून आपण त्यातून शिकायला हवे. आजचा सामना आमच्यासाठी वाईट होता. पण आता पुढच्या सामन्याचा विचार करणं आवश्यक आहे. आधी म्हटल्याप्रमाणे अशा संधी गमावणं खूपच महागात पडतं. त्यामुळे कर्णधार म्हणून मी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे", असेही विराट म्हणाला.