औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (एमफार्म) नियमनाचे अधिकार ‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागा’ऐवजी (एआयसीटीई) ‘भारतीय औषधनिर्माण परिषदे’कडे सोपविण्यात आले आहेत. यामुळे औषधनिर्माण शास्त्राचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
एआयसीटीई १९८७ ला   अस्तित्त्वात आल्यानंतर एम. फार्मच्या नियमनाचे अधिकार या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या केंद्रीय संस्थेकडे सोपविण्यात आले. मात्र, त्यामुळे औषधनिर्माण शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विचका झाल्याची भावना तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत होती.
संस्थांकडे विशेषत: खासगी महाविद्यालयांकडील पायाभूत व शैक्षणिक सुविधांची दखल न घेताच एम.फार्मची प्रवेश क्षमता दरवर्षी वाढविण्यात येत होती. याचा परिणाम अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवर होत होता.  महाराष्ट्रात तर औषधनिर्माण शास्त्राची तब्बल १५४ महाविद्यालये आहेत. त्यांचे नियमन परिषदेतर्फे उत्तमरित्या होईल अशी अपेक्षा आहे. डिसेंबर, २०१४मध्ये केंद्र सरकारने या संबंधातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.