मूक मोर्चात हजारो मराठी भाषिक सहभागी मराठी भाषकांचा भाग कर्नाटकला जोडल्याच्या निषेधार्थ बुधवारी बेळगावसह सीमाभागात काळा दिन पाळण्यात आला. बेळगाव येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला हजारो मराठी भाषकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १९५६ नंतर आज प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने युवक रस्त्यावर उतरल्याचे जुन्या कार्यकर्त्यांनी सांगितले. आजच्या प्रतिसादातून मराठी भाषकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची इच्छा पुन्हा एकदा अधोरेखित झाली . बेळगावसह इतर मराठी भाषक भाग कर्नाटकास जोडल्याच्या निषेधार्थ बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. १ नोव्हेंबर १९५६ या दिवशी कर्नाटक राज्याची निर्मिती होऊन बेळगाव, गुलबर्गा, बिदर, भालकी, निपाणी आदी मराठी भाषक भाग व ८१४ गावे कर्नाटकात घुसडण्यात आली. तेव्हापासून बेळगाव परिसरातील या भागात एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून पाळण्यात येतो. १९५६ पासून मराठी भाषकांवर कर्नाटकात राहण्याची सक्ती करण्यात येत आहे. तेव्हापासून या भागातील मराठी भाषक जनता महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. आज बेळगावातील संभाजी उद्यान येथे मराठी भाषकांची एकजूट दिसून आली. येथून मूक मोर्चाला सुरुवात झाली. कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ युवकांनी काळे कपडे परिधान केले होते. हाती भगवा ध्वज घेऊन आबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते. बेळगाव, बिदर, भालकी आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा आशयाचे फलक सर्वत्र दिसत होते. उत्तर बेळगाव, दक्षिण बेळगाव अशा माग्रे फेरी मराठा मंदिर येथे आली. येथे आमदार नीतेश राणे, आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर यांची भाषणे झाली.