इचलकरंजी शहरामध्ये आणखीन तिघा जणांना स्वाइन फ्लू सदृश आजाराची लागण झाल्याने प्रशासन गोंधळात सापडले आहे. या तिन्ही रुग्णांवर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शनिवारी इंदिरानगर परिसरातील सौ. वैशाली केंगार या महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. या महिलेस पाच जणांना या आजाराची लागण झाली होती. मात्र, चौघांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तोच आज आणखी तिघांना स्वाइन फ्लू सदृश आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. एका महिलेसह तिघांनाही कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.
स्वाइन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासन गोंधळात पडले आहे. हा आजार फैलावू नये यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांत जनजागृती करावी अशी मागणी होत आहे.