प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक विचारवंत प्राचार्य अनुराधा कृष्णराव गुरव (वय ७९) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या इच्छेप्रमाणे परिवाराने देहदान केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील बाळे या गावी त्यांना जन्म झाला. शिक्षण आणि लेखन या क्षेत्रात त्यांनी प्रभावीपणे काम केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागाच्या प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घ काळ काम केले. त्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील डी. एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणून सेवा बजावली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठाच्या विभागीय संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते. वैवाहिक व शै़क्षणिक समुपदेशानाचे कामही त्या करत होत्या. विपुल ग्रंथसंपदा - त्यांचे ३० कथासंग्रह, १३ कादंबर्या, एकांकिका संग्रह, बालसाहित्याची ३० पुस्तके, नवसाक्षर साहित्याची ४३ पुस्तके, शैक्षणिक १२ पुस्तके, लेखसंग्रह १६ पुस्तके असे विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. विविध सामाजिक- साहित्यिक- शैक्षणिक संस्थांवर अध्यक्षा आणि सदस्य म्हणून त्या कार्यरत होत्या. साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. त्यांच्या मागे मुलगा डॉ. आशिष, मुलगी डॉ. तृप्ती, बहीण डॉ. लीला पाटील, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.