कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रति पंढरपूर नंदवाळ येथे टाळ मृदंगाच्या गजरात आणि ‘माउली माउली..’चा जयघोषात शुक्रवारी आषाढी एकादशीचा उत्सव पार पडला. पावसाच्या सरी झेलत मंगलमयी वातावरणात मंगळवारी नंदवाळ दिंडीतील रिंगण सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर यंदा ही राजकीय वारी ठरली.
नंदवाळ गावी आज आषाढी वारीनिमित्त कोल्हापूरहून निघालेल्या दिंडीत पंचक्रोशीतील वारकरी बंधू—भगिनी सहभागी झाले होते. यानिमित्त शहरात नगरप्रदक्षिणेचे आयोजन केले होते. दिंडीच्या नगरप्रदक्षिणेमुळे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील वातावरण भक्तिमय बनले होते. श्री ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार पेठेतील विठ्ठल मंदिरात सकाळी सात वाजता सामूहिक आरती झाली . यानंतर बिनखांबी गणेश मंदिर मार्गाने दिंडी रवाना झाली. खोलखंडोबा इथे उभे रिंगण पार पडले. यानंतर राधानगरी रोड ,साने गुरुजी वसाहत मार्गे ही दिंडी निघाली.
पुईखडी येथे विसावा झाला. येथे झालेले रिंगण दिंडी सोहळम्य़ातील आनंदाचा सर्वोच्च बिंदू ठरला. ‘माउली माउली ग्यानबा तुकाराम’च्या गजरात महिलांनी फु गडीचा फेर धरीत रिंगण सोहळम्य़ाला सुरुवात झाली. येथे भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील,आमदार चंद्रदीप नरके आदी मान्यवरांनी पालखीचे पूजन केले. पंढरपूर-वाखरी प्रमाणे विठू माउली च्या गजरात गोल रिंगण पार पडले.
नंदवाळमध्ये वैष्णवांचा मेळा
या नंतर दिंडी नंदवाळकडे रवाना झाली. येथे काल रात्रीपासूनच वारकरी व वैष्णवांची नंदवाळ ग्रामी रीघ लागली होती. आज हजारो भाविकांनी सावळ्या पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त गावात प्रशासनाने सुसज्ज तयारी ठेवली होती.