ऐन पावसाळय़ात दडी मारलेल्या वरुणराजाने जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी दमदार हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच सुखावला. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने धरणांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे.
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दमदार हजेरी लावलेल्या पावसाने जूनच्या पहिल्या आठवडय़ानंतर दडी मारली होती. प्रारंभी झालेल्या पावसाने जिल्ह्यात समाधानकारक पाणीसाठा झाला होता. खरीप हंगामातील पिकांनाही चांगला दिलासा मिळाला होता, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. राज्यात सर्वत्र दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती. सरकार व प्रशासनाने दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. तसेच वेळ पडल्यास उद्योगांचे पाणी बंद करून प्रथम पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजनही शासन पातळीवर सुरू केले होते.
दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने ऐन पावसाळय़ात नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत होता. गुरुवारी सकाळी पुन्हा पावसाने दडी मारल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली. दोन दिवसांत पडलेल्या पावसाने शहरातील ड्रेनेज व गटारींचे तुडुंब भरून वाहात होत्या. शहरातील विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहनधारकांना कसरत करत मार्ग काढावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Continue rain on second day in kolhapur
First published on: 11-09-2015 at 03:30 IST