कोल्हापूर : पंचगंगा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर टाकत आंदोलकांनी सोमवारी निषेध नोंदवला. दोन दिवसांमध्ये नदीतील मृत माशांचा खच काढून घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पंचगंगा नदीमध्ये वळीवडे, रूकडी परिसरात मृत माशांचा खच पडला आहे. तीन दिवस झाले तरी या घटनेकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत आज लोककल्याण व संघर्ष समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांपाठोपाठ पोलीसही मोठय़ा संख्येने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांच्या दालनात आले. याला आंदोलकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांना बाहेर जाण्यास सांगितले. नदीतील मृत माशांबद्दल विचारणा केल्यावर आंधळे यांनी हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जबाबदारीचा भाग नसल्याचे सांगितले. त्यावर आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यप्रणालीतील संदर्भ घेऊन ही जबाबदारी याच कार्यालयाची कशी आहे हे पटवून दिले. याचवेळी आंदोलकांनी मृत मासे आंधळे यांच्या समोर टाकले. शासकीय प्रयोगशाळेत मृत माशांचे विच्छेदन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. मासे मृत होण्याची कारणे सुरुवातीला जबाबदारी नाकारणारे प्रदूषण नियंत्रण अधिकारी अखेर मासे मृत होण्याचा प्रकार कोल्हापूर महापालिकेचा सांडपाणी प्रकल्प, ग्रामपंचायतींचे विनाप्रक्रिया नदीत मिसळणारे मैलायुक्त सांडपाणी, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे प्रक्रियायुक्त सांडपाणी हे कारण असल्याचे कबूल केले. मात्र कार्यवाही कोणती केली जाणार याबाबत कसलाच उल्लेख केला नाही. यावेळी संघर्ष समितीचे बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, अमर निंबाळकर, अशोक भंडारी, किशोर घाटगे, दुर्गेश लीन्ग्रस आदींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.