तब्बल ३०६९ ओळी आणि १३,३६३ शब्द साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ठसा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आता देशातील सर्वात मोठय़ा दीर्घकवितेचा विक्रम नोंदवला जाणार आहे. सातारा येथील कवी यशेंद्र प्रभाकर क्षीरसागर यांनी तब्बल ३०६९ ओळींची आणि १३,३६३ शब्दांची ही दीर्घकविता ‘भारतीय संस्कृती’ या विषयाच्या भोवती गुंफली असून तिचे प्रकाशन उद्या (१४ मे) जयसिंगपूर येथे होत आहे. सध्याचा भारतातील दीर्घकवितेचा विक्रम हा २६६२ ओळी आणि १०६७० शब्दांचा असून, ही दीर्घकविता आसामी भाषेतील आहे. कवी क्षीरसागर यांनी तब्बल ३०६९ ओळींची आणि १३,३६३ शब्दांची ही दीर्घकविता लिहिली आहे. ‘भारतीय संस्कृती’वर ही कविता तयार केली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स अशा भारतातील विविध विक्रमांची नोंद ठेवणाऱ्या संस्थांकडे या कवितेची नोंद केली जाणार आहे. कवी क्षीरसागर यांचा वाङ्मय क्षेत्रात गेली १० वष्रे वावर आहे. त्यांचा ‘मनातली वादळे’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. या उपक्रमात कवितासागर प्रकाशनचे डॉ. सुनील पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. या दीर्घकवितेस डॉ. कुमार रामगोंडा पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. या कवितेच्या प्रकाशन समारंभास प्रा. प्रवीण हेमचंद्र वैद्य, कवी विश्वास बालीघाटे, प्राचार्य बी. बी. गुरव, कवी विष्णू रामू वासुदेव, उद्योगपती संजय सुतार, लेखिका विजया प्रकाश पाटील, रोझमेरी राज धुदाट आदी उपस्थित राहणार आहेत.